पाथर्डी (प्रतिनिधी) -तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून काही भागात जोरदार गारपीट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका, संत्रा, कांदा या रब्बी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील पूर्व भागात शनिवारी रात्रीच काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला होता. रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण तालुक्यात अवकाळी पाऊस होऊन अनेक ठिकाणी गारा पडल्या. शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या पूर्व भागातील खरवंडी कासार, येळी, भालगाव, मिडसांगवी, टाकळीमानुर ,कोरडगाव, परिसरात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.
खरवंडी व येळी परिसरात जोरदार गारांचा पाऊस पडला. पश्चिम भागातील करंजी, चिचोंडी, तिसगाव, मिरी परिसरात अवकाळी पावसासह गारा पडल्या. सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या रब्बी पिकाची काढणीची लगबग सुरू आहे. काढणी केलेली पिके शेतात पडून आहेत तर काढणीला आलेली शेतातच उभी आहेत. त्यातच अचानक अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत पावसाने भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पावसाबरोबर जोरदार वारा असल्याने संत्र्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्र्यांचा अक्षरशः सडा झाला आहे.
नगर, दि. 1 (प्रतिनिधी) -नगर शहरातील काही भागांत आज जोरदार पावसाने हजेरी लावली. शहराबरोबरच नगर तालुक्यातील काही गावांतही पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
नगर शहरात सावेडी, बोल्हेगाव येथे पाऊस झाला. तसेच नागरेदवळे परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसाने हरभरा, कांदा, गहू आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. आज सकाळी ऊन पडले होते. त्यानंतर अडीचच्या सुमारास नगरमध्ये पावसास प्रारंभ झाला. बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर परिसरात हलक्या सरी कोसळल्या. तसेच भिंगार, नागरदेवळे, पाइपलाइन रोड परिसरात हलक्या सरी कोसळल्या. तसेच शहरातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
शेवगाव, दि.1 (प्रतिनिधी) -तालुक्यातील जायकवाडी धरण पट्ट्यातील शहरटाकळी, देवटाकळी, बक्तरपूर, मजलेशहर, भातकुडगाव, घोटण, एरंडगाव, लाखेफळ, नविन दहिफळ, जुने दहिफळ, आंतरवाली खुर्द, खानापूर, कऱ्हेटाकळी या जायकवाडी पट्टयातील परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले.
या पावसामुळे आज शेवगावच्या आठवडे बाजारावरही परिणाम झाला. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला स्वस्तात विकण्याची वेळ आली. लाखेफळ, समसुद व भागवत एरंडगाव, खानापूर येथील शेतकरी दिपक सोनवणे, अशोक आवारे, गोरक्ष फुंदे, दादासाहेब बनसोडे, ज्ञानदेव सोनवणे, रमेश आवारे, दत्तात्रय ढाकणे, नाथजी सानप, रंगनाथ गाढेकर, संतोष धस, गणेश धस, गणेश भागवत, उत्तम भागवत, विठ्ठल धस, राजेंद्र धस, सुधीर बोडखे, अशोक फासाटे, भारत थोरात, बबन थोरात यांच्या गहू पिकाचे तर सुधीर सोनवणे, यमाजी क्षिरसागर, शिवाजी आव्हाड, रमेश सुपेकर, महेश सुपेकर, यांच्या केळी, शेषेराव भावगत, संदीप भागवत यांचे डाळींब बागेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी तहसीलदार असिमा मित्तल, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे या शेतकऱ्यांनी केली आहे.