नगर – नगर शहराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या दिल्लीगेट रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळा तोंडावर आहे. अशावेळी या बाजुने प्रवेश करताना सावेडी उपनगरात वाहतूक आणि पाणी कोंडींचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
रखडलेल्या या रस्त्याची अत्यंत तातडीने दुरस्ती होण्याची गरज असल्याची भूमिका कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या सुप्रिया जाधव व माजी नगरसेवक ऍड. धनंजय जाधव यांनी केली आहे. त्या संदर्भात जाधव यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून, त्यात संभाव्य अडचणी व त्यातून निर्माण होणारा मोठा धोका स्पष्ट केला आहे.
न्यू आर्टस कॉलेज ते निलक्रांती चौक दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, रस्त्याची साफसफाई बाकी असल्याने तो अजून वापरात नाही. तसेच रस्त्याच्या दुतर्फा नाल्याचे कामही मंजूर करण्यात आलेले आहे. मात्र, त्या कामास अजून सुरुवात झालेली नाही. या भागात पावसाचे पाणी हमखास साचते. त्यामुळे तातडीने काम होण्याची गरज जाधव यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नगर शहर व उपनगरातील बहुतांश रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. बालिकाश्रम रस्ताची अवस्थाही अत्यंत बिकट आहे. शहरातील नालेसफाई तातडीने होण्याची देखील गरज आहे. अन्यथा पाण्याची कोंडीने नगरकरांचा श्वास कोंडला जाईल, अशी भीती कॉंग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी आयुक्तांच्या कानावर घातली आहे.
अनेकदा घडलाय अनर्थ…!
पावसाचे नागरीवस्तीत तसेच दुकानांत पाणी शिरल्याने यापूर्वी अनेकदा अनर्थ घडलेले आहेत. आताही कामास प्रारंभ न झाल्यास भविष्यात नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे तातडीने हे काम सुरु होण्याची गरज असल्याची भूमिका सुप्रिया जाधव व धनंजय जाधव यांनी मांडली आहे.