तेरा फेब्रुवारीची बातमी. राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या दिवशी. “हीरक महोत्सवी महाराष्ट्र’ या विषयावर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सादरीकरण केलं होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठी नाटक, मराठी चित्रपट, लोककला, गडकिल्ल्यांवर वीररसयुक्त कार्यक्रम, छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर कार्यक्रम, समाजसुधारकांचा महाराष्ट्र, राष्ट्रामधील महाराष्ट्र, विश्वातील महाराष्ट्र, महाराष्ट्राची संतपरंपरा, शास्त्रीय संगीत महोत्सव, आदिवासी संस्कृती महोत्सव, क्लिक महाराष्ट्र, महाराष्ट्राची कृषी संस्कृती, लोककलाकारांचा मेळावा, कव्वाली महोत्सव… एक ना अनेक! वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम साजरे करायचे आणि आपल्या महाराष्ट्राचं हीरक महोत्सवी वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं करायचं, अशी संकल्पना मांडली गेली. हे कार्यक्रम आजपासून सुरू होणार होते. मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आणि सांस्कृतिक कार्य विभागानं तयारीही सुरू केली.
पुढे एक-दीड महिन्यात या राज्यावर मोठं संकट येईल आणि हीरक महोत्सवाचा आनंद हिरावला जाईल, याची तेव्हा कुणाला कल्पनाही नव्हती. वास्तविक, करोना विषाणूचा राक्षस त्यावेळीच बाटलीतून बाहेर आला होता आणि जगभरात हळूहळू पाय पसरू लागला होता. तरीसुद्धा, 21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनजवळ 106 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून जन्माला आलेल्या महाराष्ट्राचा हीरक महोत्सवी स्थापना दिवस साजरा करताना हा राक्षस महाराष्ट्रात एवढं थैमान घालेल, हे त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं आणि महाराष्ट्रानं हीरक महोत्सवाची खूप स्वप्नं रंगवली.
शिवबांच्या मावळ्यांनी धारोष्ण रक्ताचा अभिषेक घालून मराठी माणसाची अस्मिता जागवली; ताठ कण्यानं उभं राहायला शिकवलं. त्याच मराठी माणसानं पुढे अनेक भीमपराक्रम केले. देशात अग्रेसर असा महाराष्ट्र घडवला. अन्याय झुगारून स्वाभिमानानं जगण्याचा संस्कार जसा या महाराष्ट्राला शिवरायांनी दिला, त्याचप्रमाणं विवेकानं विचार करण्याची शिकवण या मातीतल्या प्रदीर्घ संतपरंपरेनं दिली. भेदाभेद विसरून एकोप्यानं जगायला शिकवलं. भक्ती-शक्तीच्या या नांगराने महाराष्ट्राच्या मातीची अशी काळजीपूर्वक मशागत केली, की या मातीतून मोती पिकू लागले. समतेच्या आणि शिक्षणाच्या चळवळी इथं निर्माण झाल्या; रुजल्या! घरादारावर तुळशीपत्र ठेवून इथल्या समाजसुधारकांनी मराठी माणसाचा आधुनिक पिंड घडवला. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. मुलींना मुलांच्या बरोबरीनं शिक्षण देण्याची मानसिकता रुजवली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या महाराष्ट्रानं औद्योगीकरणात आघाडी घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचा वेग आणखी वाढला आणि हा महाराष्ट्र देशाच्या विकासाचा मानबिंदू ठरला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बनली आणि राज्या-राज्यांतून आलेल्या लाखो कुटुंबांचं पोट भरू लागली. सहकाराच्या चळवळीनं ग्रामीण अर्थकारणाला चालना दिली. कारखान्यांचे भोंगे ग्रामीण भागातही घुमू लागले. दुधाच्या नद्या आणि साखरेचे डोंगर हे ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र बनलं. तंत्रज्ञानातही आपण आघाडीवर राहिलो.
असा हा समर्थ, सक्षम आणि बलवान महाराष्ट्र हीरक महोत्सव साजरा करताना दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. एकमेकांच्या साथीनं आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पण महाराष्ट्र जसा यापूर्वी देशाला दिशा देत राहिला, तसाच याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग महाराष्ट्रच दाखवेल.
पायापुरती वहाण कापण्याचा संस्कार आमच्यावर झालेला नाही, हे मराठी माणूस संकटाच्या काळातही दाखवून देतोय, हीच महाराष्ट्र नावाच्या हिऱ्याची खरी चमक!
– हिमांशू