मुंबई -हॉकीपटूंची भीती निरर्थक असून खेळाडूंचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशा शब्दांत मुंबई हॉकी संघटनेचे सचिव रामसिंग राठोड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एक राज्य एक संघटना या नियमामुळे मुंबई हॉकी संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह येईल, अशी भीती व्यक्त करत संघटनेशी संलग्न असलेल्या जवळपास 12 खेळाडूंनी हॉकी वाचवा, असे आवाहन केले होते. मात्र, हॉकी इंडियाच्या घटनेशी संघटना बांधील आहे. त्यांच्या नियमानुसारच एका राज्यात एकच संघटना असावी, या नियमाचे स्वागत करण्यात आले. मात्र, हा निर्णय खेळाडूंसाठी नुकसानकारक ठरणार नाही. प्राधान्य खेळाडूंच्या हितालाच देण्यात येईल, असेही राठोड यांनी सांगितले.
हॉकी इंडियाने राज्य संघटनेचे अस्तित्व संपविल्याचे मत या खेळाडूंनी व्यक्त केले होते. खेळाडूंच्या नोकरीच्या संधी, त्यांना मिळणारे मानधन यावर या निर्णयाने विपरीत परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, खेळाडू विनाकारण या मुद्द्याला महत्त्व देत आहेत. संघटनेचे अस्तित्व जरी या निर्णयामुळे संपुष्टात आले तरी खेळाडूंनी घाबरून जाण्याची गरज नाही. आज देशातील सर्वच क्रीडा संघटनांमध्ये एक राज्य एक संघटना हा नियम राबवला जातो, मग हॉकी इंडियाने मान्य केलेल्या या नियमांचा इतका उहापोह करण्याची आवश्यकता नाही, असेही राठोड यांनी सांगितले.
आज संघटनेला विविध वयोगटातील संघ तयार करतानाही अडचणी येतात. अनेकदा सिनीअर गटाच्या संघात ज्युनिअर खेळाडूंनाही स्थान द्यावे लागते. खेळाडूंचा सेकंड बेंचच आज संघटनेकडे नाही. हॉकी इंडियाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध राज्यांच्या संघटनेची ही अवस्था पाहूनच हा निर्णय घेतला आहे, अशी टीका व्यर्थ असल्याचेही ते म्हणाले.