सराईतांना वाटेना पोलिसांचा धाक
पुणे – शहरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या आठवड्यांत चौघांची निर्घृण हत्या झाली. यातील तीन गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर एका मृताची अद्याप ओळखच न पटल्याने या गुन्ह्याचा उलगडा झाला नाही.
शहर अनलॉक होत असतानाच शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे जुलै आणि ऑगस्टमध्ये वाढले. काही दिवस शांततेत गेल्यावर सप्टेंबरमध्ये पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले. बहुतांशी घटनांत खून झालेला आणि तो करणारे सराईत गुन्हेगार आहेत. जामिनावर अथवा करोनासाठी मिळालेल्या तात्पुरत्या जामिनावर ते बाहेर आले होते.
या सराईत असूनही जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे आणि त्यांची नियमित चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगतात. मात्र, तरीही हे गुन्हे घडतातच कसे? याबाबत मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी मूग गिळतात.
कोयता, चॉपर, चाकू, तलवार, लोखंडी रॉडचा वापर सर्रास बनला आहे. भर चौकात, गर्दीच्या ठिकाणी, पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरही हे खून होताहेत हे भयावह आहे. स्वारगेट येथे फक्त मोबाइल आणि 1800 रुपयांसाठी एका प्रवाशाचा तर निर्दयी खून झाल्याची घटना ताजीच आहे. म्हणजेच तपासात गुन्हेगार पकडले जातात, पण गुन्हा करताना दहादा विचार करावा, असा धाक सध्या दिसत नाही.
स्थळ : पिसोळी
पिसोळीत पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बालाजी गॅरेजसमोर 27 सप्टेंबरला दुपारी हा प्रकार घडला. दोन गटातील वादातून हा खून घडला. काही आरोपींना अटक केली आहे. सागर दादा औताडे (रा. औताडेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्या खुनातील आरोपींना जेरबंद करण्यात आले असून तेही सराईत गुन्हेगार आहेत.
स्थळ : आंबेगाव
मुंबई-बंगळूर महामार्गावरील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यात टाकून दिल्याचे 29 सप्टेंबरला उघडकीस आले आहे. ही घटना स्वामी नारायण मंदिराजवळ सकाळी उघडकीस आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोते उघडले असता, त्यांना आतमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह दिसला. याचा उलगडा अद्याप झाला नाही.
स्थळ : वानवडी
तडीपार गुन्हेगाराने सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी तडीपार गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ ऊर्फ धुमाळ मनोज शिरसवाल असे आरोपीचे नाव आहे. तर अजय दादू खुडे असे मृताचे नाव आहे. मृतावर खडक व बंडगार्डन पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल होते.