नगर -केंद्रातील मोदी सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे नगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला आहे.
नगर शहर व जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. त्यानिमित्त मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत निदर्शने केली. यावेळी डॉ.भामरे बोलत होते.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, कॉंग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष अज्जूभाई शेख, अक्षय कुलट, प्रवीण गीते यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
शेळके म्हणाले, “”आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत नेणार आहोत. आगामी काळात जिल्हा परिषद गट, त्याचबरोबर पंचायत समिती गण स्तरावरती शेतकरी रस्त्यावर उतरून कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करतील.” काळे म्हणाले, “”कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संपवून टाकण्याचे षड्यंत्र केंद्र सरकारने चालवले आहे.”