माझ्या भाच्याने एक मांजराचे पिल्लू आणले होते. अगदी छोटे होते ते. हडकुळे, पण अगदी तल्लख. मांजराची जातच तशी तल्लख असते. तल्लख आणि मतलबी. माझी आजी नेहमी सांगायची की माणसाने कुत्रा पाळावा, पण मांजर पाळू नये. कारण कुत्र्याचे प्रेम आणि निष्ठा ही मालकाशी, माणसाची असते. मात्र मांजराचे तसे नाही. मांजराला माणसांचे काही देणेघेणे नसते. त्याचे प्रेम घरावर असते. ज्या घरात खायला मिळेल ते घर त्याचे. मग माणसे कोणी का असेनात. कुत्रा सहसा दारातच असतो. घरात त्याला प्रवेश वर्ज्य. मांजर मात्र साऱ्या घरभर फिरते. त्याला पूर्ण मोकळीक असते. म्हणजे ती त्याला कोणी द्यावी लागत नाही. त्याची ती हक्काने घेते. किचनपासून ते बेडरूमच नाही, तर बेडपर्यंत त्याचा मुक्त वावर असतो. थंडीत कुत्रा बाहेर कुडकुडत असला, तरी मांजर मात्र बेडवर अगदी उबेत शांत झोपलेले दिसते. त्याला पायाने दूर उडवले तरी पुन्हा ते येतेच-आल्याशिवाय राहत नाही.
दारातला कुत्रा म्हणतो, कधी माझ्या मालकाच्या घरात मुलेबाळे खेळतील आणि मला भाकरतुकडा घालतील. उलट मांजर म्हणत असते, कधी मालकाचे डोळे जातील आणि मला दुधावर ताव मारायला मिळेल. अर्थात हे माझी आजी सांगायची. आणि ते मला पटायचेही. कारण मांजर सहसा घरातील माणसांकडे ढुंकूनही न पाहता घरभर वावरत असते. जणू घर आपले आहे, आणि ही माणसेच उपरी आहेत. आपण त्यांच्यावर उपकार करतो. कुत्रा बांधून ठेवलेला दिसतो, पण मांजर कधी बांधून ठेवलेले मी तरी पाहिलेले नाही. आणि मी बरीच मांजरे पाहिलेली आहेत. घरातलीही आणि बाहेरचीही.
कुत्रा माणसाला पाहून प्रेमाने शेपटी हलवतो. बागडतो. तसे मांजराला करताना मी तरी कधी पाहिले नाही. मांजर फार तर घशातल्या घशात गुर्मीचा गुर्रगुर्र आवाज करत माणसाच्या पायाला अंग घासण्याचे काम करते, ते ही त्याने आपल्याकडे लक्ष द्यावे, काही तरी-म्हणजे जास्त करून दूध द्यावे म्हणून.
जेवायला बसल्यावर मांजर आशाळभूतपणे ताटासमोर बसते. केवळ मार खाण्याच्या भीतीनेच ती ताटात तोंड घालत नाही. कोकणात मला आठवते. शिरोडकर नावाच्या माझ्या मैत्रिणीच्या घरी मी नेहमी जायचे. आमच्या शेजारीच राहायची ती. त्यांच्या घरी सारे जेवायला बसले की हाती काठी घेऊनच बसत असत. विशेषत: जेवणात मासळी असली-आणि ती आठवड्यातील चारपाच दिवस तरी असायचीच, की मांजरावर लक्ष द्यावे लागायचे. घरातील माणसे जेवायला बसल्यानंतर घरातील तीनचार मांजरे समोर बुभुक्षिताप्रमाणे बेचैनपणे ताटावर एकटक नजर लावून वळवळत असायची. केवळ हातातील काठी पाठीत पडेल अशा भीतीमुळेच ती दूर राहायची. तरी एखादे आगाऊपणा करून मार खायचेच. त्या मांजराच्या पिल्लाला पाहून मला या आणि अशा अनेक गोष्टींची आठवण झाली. आणि दोन बोक्यांचे भांडण ही गोष्टही आठवली. लहानपणी खूप वेळा ऐकलेली. दोन बोक्यांना लोण्याचा गोळा सापडतो.
त्याच्या वाटणीवरून त्यांचे भांडण सुरू होते. कसेच एकमत न झाल्याने ते कोल्ह्याकडे जातात. कोल्हा त्यांना न्याय वाटणी करून देण्याचे आश्वासन देतो. एक तराजू आणतो. लोण्याचे दोन भाग करून त्या तराजूत ठेवतो आणि तराजू समतोल करण्यासाठी एका पारड्यात जादा झालेले लोणी खाऊन टाकतो. तेव्हा दुसरे पारडे खाली जाते. मग कोल्हा दुसऱ्या तराजुतील लोणी खातो. आणि असे करता करता दोन्ही पारड्यातील लोणी खाण्याचा सपाटा लावतो. शेवटी लोण्याचा उरलेला गोळा आपली फी म्हणून गट्टम करतो. हा गुण मांजराने माणसाकडून घेतलेला आहे की, माणसेच हा गुण मांजराकडून शिकत आहेत, काही निश्चित सांगता येत नाही. काही असो.
अश्विनी महामुनी