गौरी देशपांडे यांच्या “पाऊस आला मोठा’ आणि “ओहोटी’ या दोन कथांवर आधारित असलेला चित्रपट “आम्ही दोघी’ हा आपल्याला अंतर्मुख करतो आणि म्हणून तो मला विशेष भावला. सावित्री (प्रिया बापट) आणि तिचे वकील असलेले वडील चांगल्या मोठ्या बंगल्यात नोकरचाकरांसह राहताहेत. आतापर्यंत दुसऱ्याला समजून घेण्याची, कुणासाठी तरी काही करण्याची सावित्रीवर कधी वेळच आलेली नाही. सावित्रीची आई लहानपणीच गेलेली. वडील शिस्तीचे. त्यांनीच लहानाचं मोठं केल्यामुळे तीही त्यांच्यासारखीच बेपर्वा, तुसडी आणि फटकळ झाली आहे असं तिचं म्हणणं!
एकदा अचानक सावित्रीपेक्षा पाचसात वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीला घेऊन वडील घरी येतात आणि मुलीला सांगतात, “ही अमला. तुझी आई. माझी बायको.’ ही अमला (मुक्ता बर्वे) अबोल, कामसू. अमला शिकलेली नाही. सावित्री सुधारक घरातली. मित्रमैत्रिणींच्या गराड्यात वाढलेली. नाटकात कामं करणारी, अभ्यासात बक्षिसं पटकावणारी. अमलाला तिचं कौतुक. स्वतःत गर्क असलेली सावित्री अमलाचा अशिक्षितपणा, वडिलांचं प्रौढ वयातलं लग्न याकडे गांभीर्यानं पाहातच नाही. चेष्टा, उपहास…!
बारावी होताच पुढच्या शिक्षणासाठी सावित्री मुंबईला जायचं ठरवते. तिनं पुण्यातच शिक्षण घ्यावं यासाठी तिचे वडील प्रयत्न करतात. पण ही हट्टी! तशीही ती घरात मनानं गुंतलेली नाहीय. निघून जाते. मुंबईत गेल्यावर तर काय, नवीन मित्रमैत्रिणी, भरपूर अभ्यास… ते झाल्यावर मग चांगल्यापैकी जॉब. स्वतंत्र फ्लॅट घेते. ती रमून जाते. एक तरुण तिच्यावर मनापासून प्रेम करतो. तिच्याशी लग्न करायचंय त्याला. पण ही आधुनिक, बुद्धिवादी! म्हणते, प्रेम ही दोन व्यक्तींमधली वैयक्तिक बाब असते आणि लग्न ही सामाजिक आणि कायद्याची बाब आहे. त्यांची गल्लत करू नको. सगळीकडून उत्तम यश, मानसन्मान… घरची आठवणही येत नाही तिला.
…तिच्या नोकरीतले असेच कुठले तरी एक मोठे यश साजरे करण्यासाठी ती बाहेर निघत असते आणि अचानक घराची बेल वाजते. बघते, तर अमला दारात उभी. ही थक्क. “इथे रहायला आले. कायमची.’ अमला म्हणते. मग सावित्रीच्या लक्षात येतं, हिच्या कपाळावरचं मोठं कुंकू, मंगळसूत्र दिसत नाहीय. म्हणजे बाबा…! तिला पार्टी कॅन्सल झाल्याचं सगळ्यांना फोन करून सांगावं लागतं. आणि ते सांगताना तिच्या लक्षात येतं की, वडील जाऊन पंधरा दिवस झाल्यावर आज आपल्याला कळतंय की ते गेले. ती चिडते. दुःख होण्यापेक्षा तिला राग जास्त येतो. विचारल्यावर अमला म्हणते, “त्यांनीच सांगितलं होतं, कळवू नको म्हणून. प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावानं केलीय त्यांनी. मला मरेपर्यंत प्रेमानं तुझ्या घरी ठेवून घेण्याच्या अटीवर.’
अमला सावित्रीच्या घरात चांगली रुळते. तिच्या घराची, तिची इतकी छान व्यवस्था बघते की, आपण इतके दिवस हिच्याशिवाय राहिलो तरी कसे असं सावित्रीला वाटू लागतं. सावित्रीच्या मित्रालाही अमला समजून घेते. या सगळ्या आनंदाच्या आणि स्वतःवर खूश असण्याच्या काळात सावित्रीला एक लहानसा धक्का बसतो. आपल्याशी लग्न न करण्याचा सावित्रीचा विचार पक्का आहे हे लक्षात आल्यावर तो मित्र दुसऱ्या एका मुलीशी लग्न करतो.
सहसा चित्रपटात मानसिक आंदोलनं दाखवली जात नाहीत. पण या चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी आहेत… अर्थातच प्रगल्भ व्यक्तिरेखा हे त्यांचे वैशिष्ट्य या चित्रपटातही दिसून येते. सावित्री मित्राच्या बायकोला पाहते, तेव्हा ती तिला फार सामान्य वाटते. म्हणजे रिलेशनशिपमध्ये बुद्धिमत्ता, हुशारी, कर्तबगारी यांची गरजच नसते की काय? जो मनुष्य माझ्यावर प्रेम करतो, तो हिच्यासारख्या सर्वसामान्य मुलीशी लग्न करूच कसा शकतो? ती गोंधळून जाते. कधी नव्हे ते पहिल्यांदाच आपले विचार, मतं तपासून पाहू लागते. अमलाही तिच्याशी या बाबतीत बोलते. हळूहळू त्या दोघींमधे एक प्रेमाचा धागा विणला जातो. ह्या दोघींची विचारसरणी वेगळी आहे. जगण्याचे मार्ग वेगळे आहेत. पण स्त्री म्हणून त्यांच्यात एक आंतरिक नाते निर्माण होते.
चित्रपटाचा शेवट तर सावित्रीला चांगलेच ताळ्यावर आणतो. चारसहा महिन्यांतच अमलाला हॉस्पिटलला ऍडमिट करावे लागते आणि सावित्रीला कळते की, अमलाला ब्लड ल्यूकेमिया आहे. अमलाचे वडील सावित्रीच्या वडिलांचे मित्र. तिला ब्लड ल्यूकेमिया आहे हे सावित्रीच्या वडिलांना माहीत असते. अमलाच्या वडिलांचे निधन होते. आता अमलाची काळजी कोण घेणार? तिला हक्काने आपल्या घरात राहता यावं म्हणून ते तिच्याशी पत्नीचं नातं जोडून घरात आणतात. तिची मुलीसारखीच काळजी घेतात. हे कळल्यावर मात्र सावित्रीला धक्काच बसतो.
आपण या दोघांच्या नातेसंबंधाकडे किती वरवरचं पाहत होतो आणि हे सारेच आपल्यापेक्षा किती प्रगल्भ आहेत, भावसमृद्ध आहेत ह्याचा तिला साक्षात्कार होतो. आणि खरंच, अश्रूंचा “पाऊस आला मोठा’ अशी तिची स्थिती होते. इतके दिवस तिच्या ज्या भावना तर्कशुद्ध आणि बुद्धिवादी विचारांखाली झाकून गेल्या होत्या, त्या उसळून येतात आणि खळखळून वाहू लागतात. प्रेक्षकही त्यात चिंब भिजून जातात. आवर्जून पहावा असा हा चित्रपट आता यूट्यूबवरही पाहता येतो.
माधुरी तळवलकर