मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाल्याचे शिरगाव पोलिसांनी म्हटले आहे. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. कारमध्ये बसलेल्या तीन जणांचा यात मृत्यू झाला असून अद्याप या तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातग्रस्त कार ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. उर्से गावाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरच्या ट्रकला या कारने मागच्या दिशेने जोरात धडक दिली. या भीषण अपघात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अपघात अत्यंत भीषण असल्याने यात कारच्या बॉनेटसह पुढील भागाचा चुराडा झाला. कारची अवस्था इतकी वाईट होती की कारचा पत्रा कटरने कापून आतील मृतदेह बाहेर काढावे लागले.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शिरगाव पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.