मुंबई – दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा “एच3एन2′ विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे.
आतापर्यंत विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र करोनाच्या संकटातून सावरला आहे. पण आता या नव्या इन्फल्युएंझा व्हायरसमुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आता राज्यातील आरोग्ययंत्रणा देखील सतर्क झाल्याचं दिसून येत आहे.
राज्यात पुन्हा निर्बंध लागतील का? अशी चर्चा रंगली होती. पण, राज्यात ज्यांना एच3एन2 ची लक्षणं जाणवत असतील किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी मास्क वापरावे, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसंच, तातडीने उपचार सुरू केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते.
त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावे. असं देखील त्यांनी सांगितलं आहे. नुकतंच विधान भवन येथे एच3एन2 आजारा विषयीची आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बद्दल सतर्कतेचा इशारा दिला.