नागपूर – नागपूर जिल्ह्यात भरधाव कार एका कंटेनर ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. नागपुर पासून 60 किमी अंतरावर असलेल्या अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-भंडारा रस्त्यावर रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
ट्रकचालकाने कोणतेही इंडिकेटर न वापरता निष्काळजीपणे वाहन रस्त्यावर उभे केले होते. या निष्काळजीपणामुळे इतर वाहनधारकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली,त्यातून हा अपघात झाला असे अरोली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मागून येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिली. पाच मुलांसह कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. कार मधील सर्व प्रवासी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होते. जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.