पिंपरी – पितृपक्षामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. पितृपक्ष संपताच सुरू झालेल्या नवरात्री महोत्सवात साबुदाणा, शेंगदाणा, वरईच्या दरात वाढ झाली आहे. महिनाभरात साबुदाणा किलोमागे 15 रुपयांना तर, शेंगदाणाच्या दरातही सुमारे 20 टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या हिटबरोबरच नवरात्रीच्या उपावासालाही महागाईच्या झळा बसत आहेत.
गेला वर्षभर भाज्या आणि किराणासह साऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यात नवरात्रीनिमित्त अनेकजण देवीचा नऊ दिवस उपवास करतात. त्यामुळे साबुदाणा, शेंगदाणा, वरई यांना मोठी मागणी वाढली आहे असून शेंगदाणे, साबूदाणा, वरई, राजगिऱ्याच्या दरात सरासरी 20 ते 50 रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे उपवास यंदा अधिक खर्चिक ठरत आहे. उपवासालाही महागाईच्या झळा बसत आहेत.
साबुदाण्याच्या किरकोळ विक्रीच्या दरात सरासरी 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति किलोचे दर 130 ते 170 रुपयांवर पोहचला आहे. बाजारात शेंगदाण्याची आवक प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, कर्नाटकातून होते. यंदा आवकही कमी झाली असून मागील महिन्यात 120 ते 140 रुपये प्रतिकिलो असणारे शेंगदाणे या महिन्यत 130 ते 170 रुपये प्रतिकिलोवर पोहचला आहे. त्यामुळे प्रतिकिलो 10 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे.
साबुदाणा प्रामुख्याने तमिळनाडू येथून विक्रीसाठी येतो. या महिन्यात साबुदाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे दरात प्रतिकिलो तब्बल 15 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील महिन्यात 3 ते 4 रुपयांची वाढ झाली होती. सध्या साबुदाणा 95 रुपये ते 110 रुपये प्रतिकिलो आहे. शेंगदाण्यामध्ये घुंगरू शेंगदाणा, स्पॉनिश शेंगदाणा असे प्रकार आहेत. प्रकारानुसार त्याचे दर ठरतात, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
वरईच्या दरात 20 टक्के वाढ
वरई विदर्भ, तमिळनाडू आणि कर्नाटकातून विक्रीसाठी येते. वरईच्या किरकोळ बाजारात 20 टक्के वाढ झाली आहे. तर, राजगिऱ्याच्या दरात तीन ते पाच रुपये वाढ झाली आहे. सध्या वरईचे दर 100 ते 130 रुपये प्रतिकिलो आहे.