कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व रुंदीकरण झाले आहे. पण, अनेक ठिकाणी महावितरणचे खांब, वीजवाहिन्यांचे अडथळे, अतिक्रमणे, अवजड वाहनांची अवैध पार्किंग व अडथळ्यांमुळे या कामाचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस हा जाच सहन करायाचा? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोलापूर, सासवडमार्गे मुंबईकडे जाणारी तसेच मुंबईकडून सोलापूर, सासवडकडे जाणारी वाहने कात्रज-मंतरवाडी बायपासमार्गे वाहतूक वळविली आहे. या मार्गावर सकाळ व सायंकाळ कोंडी होत आहे. अरुंद रस्त्यामुळे हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या मार्गातील विजेचे खांब व इतर अडथळे काढावेत. शिवाय, रुंदीकरण पूर्ण करावे अशी मागणी, अशी मागणी पिसोळीचे माजी सरपंच किरण येप्रे व उपसरपंच दीपक धावडे यांनी केली आहे.
प्रदूषणाचाही त्रास
या परिसरात नागरीवस्ती वाढली आहे. स्थानिक नागरिकांच्या वाहनांचीही गर्दी होत आहे. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पर्यायाने ध्वनी आणि वायूप्रदूषणाचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंतरवाडी-पिसोळी बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी थेट उतार आणि वळण, सूचनाफलकांचा अभाव असल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडून अपघात होत आहेत. संबंधित विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून गावांच्या ठिकाणी लावलेले सिग्नल सुरू करुन सूचना फलक लावावेत, अशी वाहनचालकांबरोबर स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
अडचणी काय?
- विद्युत खांबाच्या अडथळ्यांमुळे रस्ता रुंदीकरण रखडले
- रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी थेट उतार, जागेवर धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका
- अरुंद रस्ता आणि स्ट्रीट लाइट नाहीत. वाहनांच्या प्रखर दिव्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ होत आहे.
- रस्ता रुंदीकरण अनेक वर्षांपासून संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.