सातारा – अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळपास येणाऱ्या ऊसाला उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवली असून गाळप झालेल्या उसाला एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे. दरम्यान, गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 100 रुपयांचा तिसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खाती जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा दसरा, दिवाळी सण गोड होणार आहे.
गाळपास येणाऱ्या ऊसाला 10 दिवसांच्या आत पेमेंट देणारा कारखाना अशी ख्याती असलेल्या अजिंक्यतारा साखर कारखान्याचा यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन 2940 रुपये एवढा एफआरपी दर निघाला होता. त्यानुसार गाळप झालेल्या ऊसाला कारखान्याने प्रतिटन 2800 रुपये पहिला हप्ता आणि प्रति टन 75 रुपये दुसरा हप्ता वेळेत अदा केला होता.
दरम्यान, कारखान्याने गाळप झालेल्या उसाचा तिसरा हप्ता प्रतिटन 100 रुपये दिला असून त्यानुसार होणारी एकूण रक्कम 7 कोटी 5 लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खाती वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याने एफआरपीपेक्षा 35 रुपये प्रतिटन एवढी जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिली असून गाळप झालेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट अदा केले आहे. 100 रुपयांचा तिसरा हप्ता बॅंक खाती वर्ग करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बॅंक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.