सांगलीत सत्यजित देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शिराळा – शिराळा व वाळवा तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णत: वाया गेला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासह अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेटून दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शिराळा व वाळवा तालुक्यामध्ये परतीच्या अवकळी पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग या प्रमुख पिकांसह कडधान्य पिके उध्दवस्त झाले आहेत. याबरोबरच बागायती पिके, फळबागा, फुलशेतीसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे प्रशासनाने केले आहेत. परंतु त्याची भरपाई शासनाकडून अद्यापपर्यत मिळालेली नाही. तरी शासन निर्णयानुसार संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी व कर्जमाफी व्हावी, तसेच अतिवृष्टी, महापूरांमुळे घरांची पडझड झालेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच छोटे व्यावसायिक, हॉटेल्स, दुकान, व्यापारी यांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.
त्यांचेही पंचनामे शासनाने केले आहेत. अशा नुकसानग्रस्त व्यवसायिकांना भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, शिराळा व वाळवा या दोन तालुक्यांमध्ये वारस नोंदीची प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावावीत. अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, दत्तात्रय पाटील, प्रतापराव यादव, विकास नांगरे, भोजराज घोरपडे, सम्राटसिंह शिंदे, प्रा. सम्राट शिंदे उपस्थित होते.