पुसेगाव – भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा कणा आहे. जोपर्यंत या शेतकरी सक्षम होत नाही, त्यांना समाजात मानसन्मान मिळत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. म्हणूनच देश समृद्ध व्हायचा असेल तर शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या कुटुंबातील तरुणांना उच्च शिक्षण मिळून देशाचा भविष्यकाळ असलेली ही पिढी एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी बळ दे, असे साकडे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी घातले.
येथील सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी सनदी अधिकारी सुरेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, हरणाई सुतगिरणीचे चेअरमन रणजितसिह देशमुख, अकलूजचे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष(बाळासाहेब) जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव तसेच जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, बाजार समिती सभापती आण्णा वलेकर, सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माईनकर, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, सरपंच घनश्याम मसणे, मोहनराव जाधव, डॉ. महेश गुरव, राजेश देशमुख, मानजी घाडगे, महेश नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना अधिक पाठबळ देण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.
शेतकरी सक्षम असल्यानेच जगात अनेक देश प्रगत आहेत. आपल्या देशात इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट फॉर अग्रिकल्चर अर्थात इरमा योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टीने सक्षम होतील. आमदार महेश शिंदे म्हणाले, सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव भूमीत महाराजांची अदृश्य शक्ती लाभल्यानेच २०२२ मध्ये महाराजांच्या संजीवन समाधीला कृष्णा नदीच्या पाण्याने अभिषेक घालू शकलो. राज्य सरकारच्यावतीने ३७० कोटी रुपयांची पाणी उपसा सिंचन योजनेची कामे या भागात सुरु आहेत. त्यामुळे येत्या ४ महिन्यांत या भागातील शिवारात सर्वत्र पाणी खेळताना दिसेल.
शेतकऱ्यांची यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस वाढते आहे. यात्रा भरवण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. ट्रस्टचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील ही मोठी यात्रा आगामी काळात उच्च शिखरावर नेण्यासाठी तसेच देवस्थानचा, गावाचा विकास होण्यासाठी शासकीय निधी व विविध फंड मिळण्यासाठी खासदार व आमदारांनी विशेष सहकार्य करावे, असे आवाहन सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांनी प्रास्ताविकात केले, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले. विश्वस्त बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.