जयपूर – कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतवादी सहभागी झाल्याचे वक्तव्य भाजपच्या स्थानिक खासदार महिलेने केले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. राजस्थनातील खासदार जसकौर मीणा यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलनकारी शेतकऱ्यांमध्ये दहशतवादी आहेत आणि त्यांच्याकडे एके-47 रायफली देखील आहेत. त्यांनी खलिस्तानी झेंडेही बरोबर घेतले आहेत, असे मीणा यांनी म्हटल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. सोशल मीडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मीणा यांच्याकडून कोणतेही स्पष्टिकरण दिले गेलेले नाही.
मीणा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर कॉंग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणाऱ्या मीणा यांना खासदार म्हणून निवडून दिल्याबद्दल राजस्थानातील जनतेला लाज वाटते आहे. सत्तेत येण्यापुरतीच भाजपाची दृष्टी मर्यादित आहे. त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना भारत ब्रिटीशांपासून मुक्ती देखील नको होती. भाजप नेहमीच शेतकरीविरोधी पक्ष होता, असा आरोप राजस्थानातील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतसरा यांनी केला.
भाजपाचे प्रवक्ते रामालाल शर्मा यांनी मात्र मीणा यांच्या वक्तव्याचे समर्थनच केले आहे. “मीणा यांचे वक्तव्य चुकीचे नाही. आंदोलनामध्य्ये झेंडे आणि घोषणा दिल्या जाणाऱ्या घोषणा चुकीच्या अहेत. शेतकऱ्यांच्या अंदोलनात काही लोक घुसलेले आहेत, असे ते म्हणाले.