- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस असलेला आणि शहराच्या समृद्धतेमध्ये भर घालणारा बालनगरी हा प्रकल्प आहे. तो उभा राहिल्यास लहानांपासून ज्येष्ठांची बौद्धिक उंची वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने बालनगरी प्रकल्प रद्द करू नये, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये बालनगरी प्रकल्प रद्द करून त्या ठिकाणी संगीत अकादमी उभारण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. सन 2017 पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना बालनगरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामाची निविदा प्रसिद्ध करून कामही सुरू करण्यात आले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाल्याने काम पुढे सरकले नव्हते. बुधवारी (दि. 20) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी बालनगरीच्या जागेवर ललीत कला अकादमी उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीचा आणि विशेषत: माजी आमदार विलास लांडे यांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प रद्द केल्यानंतर लांडे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन देत हा प्रकल्प रद्द करू नये, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा प्रकल्प शहरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून एकाच ठिकाणी लहाणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तसेच महिला, शासकीय कर्मचारी, उद्योगपती, कामगार व दीन-दलितांसाठी एक चांगला आणि ज्ञानात भर टाकणारा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात येऊ नये. या मागणीचे निवेदन लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनाही दिले आहे.