Farmers Protest । आपल्या विविध मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालेत. शेतकऱ्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन आज संपली आहे. त्यानुसार आज शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी राजधानीच्या सर्व सीमांची सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्लीच्या सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.
‘चलो दिल्ली’ची पुन्हा हाक Farmers Protest ।
आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पंजाबच्या विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीवर मोर्चा नेण्याचे पुन्हा एकदा आवाहन केलंय. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने आगेकूच सुरु केलीय. त्यामुळे आज राजधानी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी दाखल होण्याची शक्यता आहे. संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो मार्च’ 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला होता, त्यानंतर आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर केल्यानंतर आजपासून पुन्हा हा मार्च सुरु करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर तगडा बंदोबस्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कारण शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना दिल्लीत पोहोचण्यास सांगितलं आहे.त्यानुसार हा बंदोबस्त करण्यात आलाय.
दिल्लीत कलम 144 लागू Farmers Protest ।
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. या अंतर्गत एका परिसरात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. आंदोलक जमतील अशा सर्व शक्य ठिकाणी पोलीस दलाची अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली आहेत.
शेतकरी ‘रेल्वे रोको’ करणार
शेतकरी संघटनांनी 10 मार्च रोजी देशभरात ‘रेल रोको’ आंदोलनाची हाक दिलीय. रेल्वे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी, ‘कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रेल्वे स्थानकांच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.”असे म्हटलं.नवी दिल्ली, जुनी दिल्ली, आनंद विहार, सराई रोहिल्ला या दिल्लीतील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.