नवी दिल्ली : सरकारने रेटिंग्स तसेच जगातील प्रतिमेचा विचार आज या काळात करु नये. देशातील शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचे रेटिंग्स बनवतात. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार? असा सवाल करत शेतकरी, मजुरांना खिशात पैसे द्यावेत अशी मागणी काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.
आज राहुल गांधी यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणे गरजेचे आहे. हे पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या पण पैसे द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच सावधगिरीने लॉकडाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले, शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे. या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिशात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारने सावकाराचं काम करू नये, अशी टीका केली आहे.
भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले. लॉकडाऊन जास्त दिवस ठेऊन चालणार नाही. सावधगिरीने लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले. तसेच शेतकरी आणि शेतमजुरांच्या खिशात पैसे जाण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.