पुणे – छाणणीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांसह ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयावर गुरुवारी (दि.19) धडक मारली. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत सनदशीर मार्गाने हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
अवकाळी व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील खरीप हंगामातील पीके वाया गेली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. मात्र, या पिकांना विमासंरक्षण असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा असल्याने दिलासा मिळाला होता. दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने विमा काढला असतानादेखील नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ होत आहे. 13 नोव्हेंबरपासून या कंपनीच्या पुण्यातील कार्यालयासमोर मुक्काम सत्याग्रह सुरू केला होता. त्याचवेळी कृषी आयुक्तालयावर मोर्चादेखील काढला होता. 15 डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, ते न पाळल्यानेच किसान सभेचे मुरलीधर नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांना छानणीचे उत्तर दिले. संतप्त पदाधिकाऱ्यांनी कंपनी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे, असा इशारा किसान सभाचे सचिव मुरलीधर नागरगोजे यांनी दिला आहे.