नवी दिल्ली (वंदना बर्वे) – दिल्लीच्या सीमेवर मागील वर्षभरापासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता संपले आहे. कृषी कायदे परत घेतल्यानंतर सरकारने उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन मागे घेतले आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारने उर्वरित मागण्या पूर्ण करण्याची हमी दिली आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सरकारने आपला शब्द पाळला नाही किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी पुन्हा आंदोलन करतील. तिन्ही कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी सतर्क, जागरूक आणि एकजूट झाला आहे. यामुळे हे कायदे आणण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार असा टोमणा सुद्धा शेतकरी नेत्यांनी यावेळी मारला.
दिल्लीच्या बॉर्डरवर जमलेले आंदोलक शेतकरी उद्या 11 डिसेंबरपासून आपापल्या घराकडे रवाना होतील. हे शेतकरी मागील वर्षभरापासून आंदोलनस्थळी जमले होते. आता दरमहा संयुक्त किसान मोर्चा बैठक बोलावून प्रगतीचा, कामाचा आढावा घेईल. पहिली बैठक 15 जानेवारी रोजी बोलाविण्यात आली आहे.
आंदोलनाच्या काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या केस आणि एमएसपीवर समिती बनविण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले आहे. यानंतर शेतकऱ्यांमध्ये आंदोलन संपण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले. आंदोलनाच्या काळात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याच्या मुद्द्यावर उत्तरप्रदेश आणि हरियाणा सरकारने सैध्दांतिक संमती दर्शविली आहे.
शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले की, उद्या 11 डिसेंबर रोजी विजय मिरवणूक काढली जाईल आणि त्यानंतर शेतकरी आपल्या घराकडे रवाना होतील. सरकारने मागण्या मान्य केल्या हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. परंतु, चीफ आफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या अकाली निधनामुळे विजयाचा आनंद साजरा न करण्याचा निर्णय किसान मोर्चाने घेतला आहे.
शेतकरी 13 डिसेंबर रोजी अमृतसर येथील स्वर्ण मंदिराला भेट देतील. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे शांतीपूर्ण मार्गाने झालेले शेतकऱ्यांचे हे पहिले आंदोलन होय, असा दावा मोर्चाने केला आहे. मात्र, आंदोलनामुळे ज्यांना त्रास सहन करावा लागला त्यांची आम्ही माफी मागतो असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. 15 डिसेंबरपर्यंत आंदोलन स्थळ पूर्णपणे रिकामे केले जाईल, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.