अमरावती – नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देवराव भाऊरावजी सांभारे (वय-53, रा. ममदापुर, जी. अमरावती) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सांभारे यांच्याकडे चार एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी सोयाबीन आणि कपाशीचे पीक घेतले होते. मात्र, खोडकिडा आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. केवळ तीनच क्विंटल सोयाबिन झाले.
कपाशीवर आशा होती मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपशीच्या उत्पन्नालाही फटका बसला.
त्यामुळे उत्पन्न शून्य झाल्याने उदरनिर्वाह कसा भागवायचा आणि बॅंकेचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. माहितीनूसार, पश्चिम विदर्भात गेल्या दहा महिन्यात 800 हून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती आहे.