केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास जेडीयूचा नकार
पाटणा-भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जेडीयूने केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हावे यासाठी त्या पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मन वळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, शहांना त्यात अपयश आले.
त्यासंबंधीची माहिती खुद्द नितीश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले नितीश शुक्रवारी पाटण्याला परतले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याच्या जेडीयूच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली. शहा यांनी मला 28 मे या दिवशी फोन आला. त्यांच्या इच्छेनुसार पुढच्या दिवशी आमची दिल्लीत भेट झाली. एनडीएच्या सर्व घटक पक्षांबरोबर सत्ता वाटप करण्याची भाजपची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. जेडीयूने एक कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारावे, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण, केवळ एक मंत्रिपद स्वीकारल्याने जेडीयूचे केंद्र सरकारमधील अस्तित्व केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचे असेल अशी माझी धारणा बनली. शहांनी आग्रह कायम ठेवल्याने मी जेडीयूमधील सहकाऱ्यांशी चर्चा करून कळवतो असे त्यांना सांगितले.
त्यानंतर मी जेडीयूचे पदाधिकारी, 16 लोकसभा सदस्य आणि 6 राज्यसभा सदस्यांशी चर्चा केली. केंद्रीय मंत्रिमंडळात जागांच्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व मिळावे अशी भूमिका सगळ्यांनीच घेतली. आपण मंत्रिमंडळापासूून दूर रहावे याविषयी आमच्यात एकमत झाले. त्या रात्री भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी माझी भेट घेऊन पुन्हा एका मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला. त्यांना मी जेडीयूची भूमिका सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शहांचा फोन आला. त्यांना मी यादव यांच्याकडे मांडलेली भूमिकाच पुन्हा सांगितली, असे नितीश म्हणाले.
जागांच्या प्रमाणानुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व कसे ठरवायचे, असा प्रश्न पत्रकारांशी विचारला. त्यावर नितीश उत्तरले, प्रत्येक पक्षाने देशभरात किंवा बिहारमध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या जागा विचारात घेऊन ते प्रमाण निश्चित करता येऊ शकले असते. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही. बिहारच्या हितासाठी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आम्ही घटक नसलो तरी केंद्र सरकारबरोबरच आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी तब्बल 39 जागा एनडीएने पटकावल्या. भाजपने 17, जेडीयूने 16 तर लोजपने 6 जागा जिंकल्या. दरम्यान, नितीश यांनी जेडीयूसाठी 3 केंद्रीय मंत्रिपदांची मागणी केली होती. त्यावर ते ठाम राहिल्याने भाजप नेतृत्वाबरोबरची त्यांची चर्चा निष्पळ ठरल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले.