मुंबई – एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ते भाजपसोबत सत्ता स्थापन करतील. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर त्यांचे डेप्युटी म्हणून एकनाथ शिंदे असे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात होते. मात्र फडणवीस यांनी आज याला छेद देत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते सेनेत आहेत व सेनेतच राहतील अशी भूमिका मांडली होती. फडणवीस यांनी देखील आज पत्रकार परिषदेत बोलताना, शिवसेना विधिमंडळ पक्ष व भाजप विधिमंडळ पक्ष एकत्र येत सरकार स्थापणार असल्याचे म्हंटले. एकीकडे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत सामान्य शिवसैनिकाला न्याय दिल्याचा संदेश तर दुसरीकडे शिंदे यांचा गट हाच शिवसेना असल्याचं दर्शवून उद्धव ठाकरेंना शह अशी खेळी फडणवीसांनी खेळली.
फडणवीसांच्या या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर एकीकडे त्यांचं कौतुक होतंय तर दुसरीकडे त्यांच्या या निर्णयावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहेत. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर फडणवीस यांचा हा मास्टरस्ट्रोक आहे की अडीच वर्षांपूर्वी केलेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा सुरु झाली आहे.
खुर्चीचा मोह नाही
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे देत त्यांना पदाची लालसा नसल्याचा संदेश दिल्याचं बोललं जात आहे. २०१९ विधानसभा निवडणुकांवेळी त्यांचे मी पुन्हा येईन हेघोषवाक्य भलतेच गाजले होते. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे राज्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागल्यानंतर यावरून त्यांची कुचेष्टा करण्यात आली होती. मात्र आजच्या फडणवीसांच्या निर्णयामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा मोह नसल्याचे दाखवून दिले असल्याचे बोलले जात आहे.
अडीच वर्षांपूर्वीच निर्णय का नाही?
२०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये सोबत लढलेल्या सेना व भाजपने मुख्यमंत्रीपदावरून फारकत घेतली होती. सेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करत भाजपला विरोधात बसवले होते. भाजप सेनेचा २५ वर्षांचा संसार मोडण्यामागे मुख्यमंत्रीपद हेच एकमेव कारण होते. अशात आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देणाऱ्या भाजपने त्यावेळीच सेनेला मुख्यमंत्रीपद दिल असत तर ही परिस्थिती आलीच नसती. तेव्हाही सेनेकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले असते तर शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबईसाठी खेळी?
महापालिका निवडणुकांना अवघे काही महिने उरले आहेत,. मुंबई महापालिका निवडणुका देखोली होऊ घातल्या आहेत. अशात शिवसेनेमध्ये उभी आडवी फटीत पडल्याने याचा फायदा भाजपला होणार असल्याचं बोललं जात होत. मात्र शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना असल्याची मांडणी फडणवीस यांनी केल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गट व भाजप एकत्रित निवडणुकांना सामोरे जातील व मुंबई काबीज करतील अशी शक्यताही बोलली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मागील सहानुभूतीची लाट थोपवण्यासाठी
शिंदे यांच्या बंडानंतर सेनेतर्फे ठाकरे यांच्यामागे सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. ही सहानुभूतीची लाट थोपवण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचे देखील बोलले जात आहे. ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यामागे शिवसैनिक व राज्यातील सामान्य जनता उभी असल्याचं चित्र दिसत होत. ठाकरे यांची वाढती प्रसिद्धी रोखण्यासाठी ही खेळी खेळली गेल्याचं बोललं जातंय.
देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद हिरवणाऱ्या ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपद व पक्ष दोन्ही काढून घेतले?
२०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र लढलेल्या सेना भाजप युतीला राज्याच्या जनतेचे स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये खटके उडाल्याने सेनेने वेगळी चूल बांधली. परिणामी मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद हिरावले गेले. मात्र फडणवीस यांनी सेनेतील पक्षांतर्गत नाराजी हेरत मुख्यमंत्रीपद व पक्ष असे दोन्हीही उद्धव ठाकरे यांच्या हातातून काढून घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे.