मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधल्यानंतर त्यांना उत्तर देताना राऊत यांनी जाहीर सभेमध्ये फडणवीसांना टोला लगावला आहे.
“नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, असे फडणवीस यांनी राऊत यांच्या दौऱ्याबद्दल म्हटलं होतं. पण याच मुद्द्यावरुन राऊत यांनी शाब्दिक चिमटा काढत फडणवीस यांना सुबुद्धी न आल्याने त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असा टोला लगावला आहे.
नागपूरमधील जाहीर सभेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी, “दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं,” असे म्हटले. “जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे. शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय,” असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
या कार्यक्रमानंतर राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधत. “ते बरोबर बोलले आहेत, त्यांना सुबुद्धीचं अजीर्ण झाल्यामुळे थोडी सुबुद्धी जर महाराष्ट्रात त्यांच्या लोकांना वाटली तर महाराष्ट्र शांत राहील. आम्ही या गोष्टी त्यांना सांगू. त्यांना सुबुद्धीचं अजीर्ण झालेलं आहे, असं वाटतं,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. तसेच, “नागपुरला महत्व आहेच, आमची उपराजधानी आहे आणि नागपूरकरांचं आमच्यावर प्रेम वाढत चाललय. बरेचसे नागपूरकर हल्ली मुंबईत असतात, त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवला.” असेही राऊत यांनी म्हटले.