बिबवेवाडी (हर्षद कटारिया) –पर्वती मतदार संघात नागरिकांच्या कररूपी पैशातून स्वतःच्या नावाची चमकोगिरी करताना माजी नगरसेवकांनी मल:निस्सरण वाहिनी सोडली तर जवळपास पालिकेच्या सर्वच विकासकामांवर संकल्पना व सौजन्य, अशा गोंडस नावाखाली स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे; परंतु हा “चालुपणा’ नागरिकांच्या लक्षात येऊ लागल्याने त्यास आता उघडपणे विरोध होऊ लागला आहे.
सॅलसबरी येथील प्रकरणातून अशा “चालुगिरीला’ नागरिकांकडून होणारा विरोध समोर आला आहे. सॅलिसबरी येथील नवीन उद्यानाला दिल्याने नावाला “सॅलसबरी पार्क रेसिडंट्स फोरम’ तर्फे मागील एक ते दिड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन करीत विरोध केला जात आहे. या प्रकरणी न्यायालयाचेही दार ठोठावण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे नाव महानगरपालिकेच्या मिळकतीला द्यावे आणि ते नाव काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन करावे, हा प्रकार दुर्देवी मानला जात असून याची चर्चा प्रभागासह शहरात सर्वत्र सुरू आहे.
महानगरपालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून विकासकामे केली जातात. पर्वती मतदार संघात दिशादर्शक फलक, शौचालये, भिंती सुशोभीकरण, रंगरंगोटी, वीजेचे दिवे, माहिती फलक, बसथांबे, एलईडी बोर्ड, पुतळे अशा अनेक कामांवर नगरसेवकांनी “चमकोगिरी’करीत “संकल्पने’च्या नावखाली स्वत:ची नावे लिहीली आहेत.
महानगरपालिकेची उद्याने, विकसित प्रकल्प, क्रीडांगणे अशा कामांना काह आजी-माजी नगरसेवकांनी आई, वडील, नातेवाईक यांची नावे सभागृहात ठराव पास करून दिली आहेत. आता, अशी नावे देण्यात सर्वच नगरसेवकांत सुरू असलेली स्पर्धा थांबविण्यासाठी नागरिकच सरसावले आहेत. ज्या नागरिकांच्या मतांमुळे पद, सन्मान मिळविला जातो, त्यांच्या मताचा आदर करणे ही निवडूण आलेल्या लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून बांधण्यात आलेल्या उद्यानाला नाव देण्याबाबत नागरिकांच्या भावनांचा आदर करावा, अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. पालिकेच्या वस्तूंना दिलेल्या नावांपेक्षा नागरिकांच्या मनात आणि हृदयात “लोकनेतृत्व’ म्हणून नाव कायम राहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सॅलसबरी प्रकरणातून नागरिक व्यक्त करीत आहेत.