मुंबई : सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यावर विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत पवार अर्धसत्य सांगत असल्याचं म्हटलं आहे.
फडणवीस यांनी म्हटलं की, ‘शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही? त्यावेळी सरकार झोपलं होतं का?,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
दरम्यान परत सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का ? सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
तत्पूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप केला होता. त्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.