नवी दिल्ली : सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. परमबीर सिंह यांचे हे पत्र दोन भागात आहे. एका भागात अनिल देशमुख आणि दुसऱ्या भागात डेलकर प्रकरणाचा उल्लेख आहे. परमबीर सिंह यांनी लिहिलेले हे पत्र धक्कादायक आहे.
The allegations against the Maharashtra Home Minister are serious: NCP Chief Sharad Pawar on former Mumbai Police Commissioner Param Bir Singh's letter to CM pic.twitter.com/3ofawNmDer
— ANI (@ANI) March 21, 2021
बदली झाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रावर परमबीर सिंह यांची सही नाही. तसेच पैसे कसे दिले घेतले गेले याचा उल्लेख नाही. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता, असा दावाही शरद पवार यांनी केला. तसेच उत्तम अधिकाऱ्याकडून या प्रकणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली.तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार सरकार स्थिर आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप केला होता.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला होता.