प्रांजली देशमुख
देशातील ज्येष्ठांची संख्यावाढीकडे आपण कोणत्या नजरेतून पाहतो, हे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिक हे समाज आणि देशासाठी समस्या आहेत का? अर्थात नाही. खरेतर ते आधारवड आहेत.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) ने देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जारी केली आहे. ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येमुळे लोकसंख्येतील संतुलन बिघडण्याची शक्यता काही तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. वास्तविक ज्येष्ठांना भारतीय कुटुंब पद्धतीत आदराचे स्थान दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठांना “ओझे’ समजण्याची वृत्ती सोडून द्यायला हवी. कारण पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढून ती आता 13 कोटी 80 लाखांवर पोहोचल्याचे म्हटले आहे. अर्थात, ही बाब पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या सहा दशकांपासून ज्येष्ठांची संख्या वाढतच चालली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आरोग्य सुविधा. जगभरात गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या सोयीसुविधा वाढत आहेत. त्यामुळे किरकोळ आजारापासून ते गंभीर आजारांपर्यंत परिणामकारक उपचार पद्धती विकसित झाली आहे. त्यामुळे लोकांचा जीव वाचवणे शक्य होत आहे. गेल्या तीन दशकांत भारताच्या स्थितीत आणखीच सुधारणा झाली आहे. अन्यथा सहा-सात दशकांपूर्वी किरकोळ आजारही विक्राळ रूप धारण करत होते आणि रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होत नव्हते. आता परिस्थितीत खूप बदल झाला आहे.
वास्तविक लोकांच्या राहणीमानात आणि जीवनमानात सुधारणा झाली आहे. जीवनशैलीत आधुनिकता आल्याने आणि नागरिकही आरोग्याबाबत सजग असल्याने कोणत्याही आजाराचा समर्थपणे मुकाबला करणे शक्य होत आहे. त्यामुळे लोकांचे आयुष्य वाढत चालले आहे. “एनएसओ’च्या रिपोर्टनुसार आगामी काळात ज्येष्ठांची संख्या आणखी वेगाने वाढेल. साहजिकच सरकार आणि समाजाची जबाबदारी वाढणार आहे.
वास्तविक देशातील ज्येष्ठांची संख्यावाढीकडे आपण कोणत्या नजरेतून पाहतो, हे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिक हे समाज आणि देशासाठी समस्या आहेत का? किंवा त्याकडे सकारात्मक बाजूने स्रोत म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे का, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्थात, या मुद्द्यावरील चर्चेला शेवट नाही. परंतु पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला चांगले, सन्मानाने आणि आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार आहे.
अशावेळी ज्येष्ठांची संख्या वाढणे ही एक समस्या म्हणून पाहणे नैतिकतेला धरून नाही. कारण आजचा तरुण हा उद्याचा ज्येष्ठ नागरिक असणार आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाचे आधारवड म्हणून मानले गेले आहे. घरातील आजी-आजोबा हे मानसिक आधाराचे केंद्रबिंदू असतात; परंतु काळापरत्वे बदल होत गेला व सामाजिक मूल्य आणि जीवन संस्कृतीने ज्येष्ठांकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. चौकोनी कुटुंबाची प्रथा प्रचलित झाली.
आजी-आजोबा एका घरात आणि मुलगा सून दुसऱ्या घरात असे विभक्त कुटुंब जागोजागी पाहावयास मिळत आहे. या नव्या रचनेमुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही आगामी काळात संकट म्हणून पाहिले जात आहे. एवढेच नाही तर न्यायालयात आई-वडिलांसमवेत होणारे कौटुंबिक वाद आणि मालमत्तेसंबंधीची भांडणे पाहावयास मिळत आहे.
आई-वडिलांना घराबाहेर काढण्यापर्यंत काहींची मजल जाते. या घटना ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचा परिपाक आहे. पश्चिम देशांच्या आधारावर भारतातही वृद्धाश्रम सुरू केले गेले आहेत. अशा स्थितीत ज्येष्ठांच्या वाढत्या लोकसंख्येला कशा रीतीने सन्मान देता येऊ शकेल, हे पाहणे गरजेचे आहे.
ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येवरून चिंता होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे आगामी काळात यामुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडण्याची शक्यता राहू शकते. चीन, जपानसह अनेक देशांत ज्येष्ठांची संख्या ही मुले आणि तरुणांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे चीनने एक मुलगा धोरण बासनात गुंडाळून तीन-तीन मुलांना जन्म देण्याची मुभा दिली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठांच्या लोकसंख्येला संकट म्हणून पाहणे गैर आहे. उलट त्यांची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत करण्याबाबत प्राधान्य द्यायला हवे.
भारतात 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचा मोठा गट हा अद्याप पेन्शन आणि सामाजिक व आर्थिक सुरक्षेपासून वंचित आहे. सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ हा प्रत्येकांपर्यंत पोहोचत नाही. उदारमतवादी अर्थव्यवस्थेत ज्येष्ठांच्या वाढत्या लोकसंख्येला आर्थिक विकासाला अडसर मानले जात आहे. म्हणून या संकल्पनेत बदल करायला हवा. ज्येष्ठांना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात कसे सामावून घेतले जाईल, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.