श्रीकांत कात्रे
माणसाला अनेकदा प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यावेळी खचून न जाता संकटावर मात करता आली तर आयुष्याला दिशा मिळते. यशोदा शिंदे या जिद्दी महिलेने कष्टाने आणि मेहनतीने आपल्या जगण्याला आकार दिला. संकटांशी मुकाबला करत त्या संघर्ष करीत राहिल्या. शिवणकामापासून केटरिंगच्या व्यवसायापर्यंत प्रयत्न करीत त्या स्वतः आर्थिक स्वावलंबी बनल्या. आपल्यासह इतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात त्या यशस्वी झाल्या. ग्रामीण भागातून आलेली महिला कुटुंबालासावरण्याबरोबरच इतर महिलांच्या संसाराला हातभार लावते, ही गोष्ट खूप महत्त्वाची. त्यामुळेच यशोदा शिंदे यांची जिद्द इतरांसाठीही अनुकरणीय ठरते.
यशोदा शिंदे यांचे माहेर रांजणगाव. आई, वडील, तिघी बहिणी, एक भाऊ असे सहा जणांचे कुटुंब. घरची परिस्थिती हलाखीची. अभ्यास आणि खेळामध्ये त्या पहिल्या असायच्या. घरासाठी काही तरी केले पाहिजे, अशा जिद्द मनात होती. बारावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर शिकण्याची इच्छा होती. पण शक्य झाले नाही. वडलांची छोटी पानटपरी होती. टपरीचे काम त्याच पाहयच्या. परभणी जिल्ह्यातील धासाडी येथील मुंजाजी शिंदे यांच्याशी लग्न झाले.
शिंदे पुण्यातील हडपसरमधील कंपनीत कामाला होते. त्यामुळे यशोदा यांना गाव सोडून हडपसरला राहण्यासाठी यायला लागले. पती कामाला जायचे. पण ते सातत्याने आजारी पडू लागले. चाकणला बदली झाली. यशोदा यांनी पतीला नोकरी सोडण्यास सांगितले. माहेरी त्यांनी शिवणकाम शिकले होते. त्या अनुभवावरून त्यांनी शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. सात- आठ हजार रुपयांचे उत्पन्न सुरू झाले.
नंतर चाकणला नोकरी मिळाल्याने त्या राहण्यासाठी आळंदीला आल्या. माउलींच्या दारात आल्यामुळे काही करण्याची उर्मी आणखी वाढली. तिथे एका केटरर्सच्या हाताखाली चपाती, भाजीसाठी मदतनीस म्हणून काम करीत आणखी उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. वसतीगृहातील मुलांसाठी किंवा एखाद्या कंपनीतील कामगारांसाठी जेवण तयार केले जायचे. हे काम करताना कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण स्वतःच हे काम करावे, असे त्यांना वाटले. मग हळूहळू त्यांनी स्वतः काम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. गावाकडे असणारा भाऊ हळद, मिरची, कांदे अशी शेती करायचा.
त्याच्याकडून सहकार्य झाल्याने मिरची पावडर, चटणी, हळद असे पदार्थ त्या विक्री करू लागल्या. स्वतःचे केटरिंगचे काम करण्याचा त्यांचा निर्धार कायम होता. आजूबाजूच्या महिलांना मदतीला घेऊन हे काम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सुरवातीला महिलांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मग बचत गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला. चटणी, मसाले विक्री करतानाच दहा महिला केटरिंगच्या कामासाठी तयार झाल्या. त्यांना बरोबर घेऊन काम सुरू केले. त्याचवेळी माणदेशीच्या धनश्री मॅडम यांची गाठ पडली. माणदेशीच्यावतीने प्रोत्साहन मिळू लागले. काही कार्यालयांशी संपर्क साधून लग्नाच्या जेवणांच्या ऑर्डर्स त्या मिळवू लागल्या. महिलांना खाऊनपिऊन रोजगार उपलब्ध होऊ लागला. सुरवातीला 50 नंतर 100, 200 अशा लोकांचा स्वयंपाक त्या करू लागल्या.
माणदेशीकडून काही प्रशिक्षण मिळाले. टरिंगबरोबरच भावाकडून येणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्या पदार्थांची विक्री त्या करू लागल्या. त्यात आयुर्वेदिक हळदीला मोठी मागणी मिळत होती. विशेषतः करोनाच्या काळात त्याचा लोकांना फायदा होत होता. त्याच्याजोडीने शिलाईकामासाठी तीन मशीन घेतल्या. पापडही बनविले.
हळद, लाल तिखट, मसाला असे पदार्थ लेबलिंग करून पुणे, मुंबईपर्यंत जाऊ लागले. हाताला चव असल्यामुळे केटरिंगचे कामही वाढत होते. इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाचे काम करीत असताना घराची जबाबदारी सांभाळून काम पूर्ण करण्यास त्यांना दिवस कमी पडतो. केटरिंगद्वारे त्यांनी इतर 15 ते 20 महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला.
त्यासाठी आळंदी परिसरातील सात कार्यालयांशी त्या जोडल्या आहेत. लग्नसराईसह इतर कार्यक्रमांच्या ऑर्डर्सही त्या घेतात. महिलांना तीनशे रुपये हजेरी त्या देतात. माणदेशीच्या व्यावसायिक सहली, विविध कार्यशाळांतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपल्या कामाला चांगली दिशा मिळाली, असे त्या सांगतात. आता त्यांना केटरिंगचा व्यवसाय अजून वाढवायचा आहे. प्रतिकूल परिस्थितीत काही करायचे या जिद्दीने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्याचबरोबर इतर महिलांना उभे करण्याचा दृष्टीकोन त्यांनी बाळगला. स्वतःबरोबर दुसऱ्याचा विचार करण्याची मानसिकता खूप महत्त्वाची असते. असा विचार यशोदा शिंदे प्रत्यक्ष कृतीत आणला. म्हणूनच त्यांनी त्यासाठी संघर्ष केला. कष्ट आणि मेहनतीतून आपले इस्पित साध्य केले. त्यांची ही जिद्दच इतरांसाठी वेगळा आदर्श आहे.