देशातील सर्वांत महत्त्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अनेकांचे डोळे उघडवणारा ठरणार आहे. निकालाचे आकडे पाहता भाजप आणि शिवसेना पुन्हा सत्तेवर येतील हे निश्चित असले तरी या पक्षांना आपला हा विजय मनापासून साजरा करता येणार नाही अशी स्थिती आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला अपेक्षेप्रमाणे 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. महायुती म्हणून 220 ते 250 जागा आणि फक्त भाजप म्हणून 140 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची भाषा सतत करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
कारण निकालावर नजर टाकली तर एक लक्षात येते की महायुतीचा आकडा कसातरी 160 च्या आसपास आहे. गेल्यावेळी स्वबळावर 123 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी जेमतेम शतक गाठता आले आहे आणि शिवसेनेलाही आपल्या पूर्वीइतक्याच जागा राखण्यात यश आले आहे. मतदारांना गृहीत धरून वाटेल त्या वल्गना करून चालत नाही. याचा धडा त्यामुळे भाजपला मिळाला आहे. केवळ निवडणुकीचे व्यवस्थापन करून विजय मिळवता येत नाही हा धडाही मतदारांनी यानिमित्ताने भाजपसारख्या पक्षांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही राज्यात प्रचाराचा धडाका लावला होता; पण मोदी आणि शहा यांनी प्रचार केलेल्या जागांपैकी सातारा आणि परळी येथील भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. ही बाबही या नेत्यांचे डोळे उघडणारी ठरणार आहे.
केवळ तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवणारे सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव तर सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे तर परळीतील पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपला अंतर्मुख करायला लावणारा आहे. मोदी आणि शहा यांच्या प्रचारसभा म्हणजे विजयाची हमी हे समीकरण खोटे ठरवण्याचे काम सातारा आणि परळी येथील मतदारांनी करून दाखवले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्या राजकीय नेत्यांचे डोळे उघडण्याचे कामही या निकालाने केले आहे. निवडणुकीपूर्वीच्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या मेगाभरतीचा लाभ घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी आपला पक्ष सोडला होता; पण या निकालावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की मतदारांना हे पक्षांतर आवडलेले नाही. कारण अशा 35 आयाराम गयारामांपैकी तब्बल 19 जणांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
उदयनराजेंचा पराभव हे त्याचे ठळक उदाहरण आहे. त्याशिवाय हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव ही आणखी काही उदाहरणे आहेत. पक्षातील निष्ठावंतांना बाजूला करून आयारामांना संधी देणे घातक ठरू शकते हा संदेशही या निकालांनी दिला आहे. मुख्य म्हणजे या निवडणुकीत प्रचार करताना स्थानिक मुद्दे समोर न आणता राष्ट्रीय मुद्द्यांना प्राधान्य देणे चुकीचे ठरू शकते हेही भाजपला आता समजले असेल. गेल्या पाच वर्षांत केलेली कामे किंवा आगामी पाच वर्षांत आपण काय करणार आहोत हे मतदारांना सांगून मते मागणे अधिक लाभदायक ठरले असते हेही सत्ताधाऱ्यांना समजले असेल. या निकालाने सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्याचे काम केले असेल तर दुसरीकडे विरोधी पक्षांना योग्य संदेश देण्याचे काम केले आहे. विजय मिळण्याची कोणतीही शक्यता नसताना हार न मानता निवडणुकीच्या मैदानात कसे उतरावे आणि जिंकून दाखवावे याचा मोठा धडा या निवडणुकीत राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घालून दिला आहे.
निवडणुकीच्या मैदानात समोर कोणताही पहेलवान नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार खोटे ठरवून पवार यांनी आपणच महाराष्ट्र केसरी असल्याचे सिद्ध केले आहे. पवार यांनी असा आदर्श घालून दिला असताना दुसरीकडे मरगळलेल्या कॉंग्रेसचे डोळेही उघडले. निवडणुकीत आपला पराभव होणार हे गृहीत धरून निवडणुकीच्या मैदानात शस्त्रे खाली ठेवून चालत नाही हे आता कॉंग्रेसच्या लक्षात आले असेल. आपण जरा जास्त प्रयत्न करून शरद पवार यांना साथ दिली असती तर महाआघाडीची स्थिती अधिक चांगली झाली असती हेसुद्धा कॉंग्रेसच्या लक्षात आले असेल. अर्थात, हे काही असले तरी राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्या महायुतीची सत्ता येणार आहे हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा दिलेल्या संधीचा उपयोग करून घेऊन खऱ्या अर्थाने राज्यातील जनतेला अच्छे दिन दाखवण्याचे आव्हान आता महायुतीला पेलावे लागणार आहे.
मतदारांनी महायुतीला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रचंड बहुमत न देता आणि एकदम काठावरील बहुमत न देता साध्या बहुमतावर आणून बसवले आहे आणि आता काम करा असा संदेश दिला आहे. पहिली पाच वर्षे काम करायला कमी पडली असतील तर मतदारांनी सरकारला आणखी पाच वर्षे दिली असल्याने त्याचा लाभ न घेणे करंटेपणा ठरेल. केवळ घोषणा देऊन किंवा शायनिंग करून काहीही साध्य होत नाही हे आता सिद्ध झाल्याने भाजप आणि शिवसेना यांनी अधिक गांभीर्याने सत्तेकडे पाहायला हवे. शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक मंदी, बेरोजगारी या विषयांना प्राधान्य द्यावेच लागेल.
केवळ विरोधक संपूर्णपणे सक्षम नसल्याने मतदारांनी पुन्हा आपल्याला सत्ता दिली आहे हे विसरून चालणार नाही. शरद पवार यांनी दिवाळीनंतर आपली पुढील रणनीती आखण्यासाठी बैठक बोलवली आहे. म्हणजेच आगामी काळात राष्ट्रवादीची धार अधिक वाढवण्याचे काम चालूच राहणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष अशाप्रकारे आतापासूनच सतर्क झाल्याने सत्ताधाऱ्यांना झोपून चालणार नाही. आता काम करावेच लागेल आणि ते दाखवावे लागेल. 220 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जेमतेम सत्ता देऊन मतदारांनी डोळे उघडण्याचे काम केले असेल तर आता सत्ताधाऱ्यांनी आपले डोळे आगामी काळात कायम उघडे ठेवून राज्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असा इशारावजा संदेश देण्याचे काम या निकालाने निश्चितच केले आहे.