पिंपरी – केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजेनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हा उपक्रम हाती घेतला होता. परंतु, करोना महामारीत दोन वर्षांचा कालावधी गेला. त्यामुळे आवास योजनेतील गृह प्रकल्पांची कामे अपुरी आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना अद्यापही आवास योजनेतील घरांचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे आवास योजनेतील गृह प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण करण्याकरिता एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी 9 जून 2014 रोजी संसदेच्या संयुक्त सत्रात केलेल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन, शौचालयाची सुविधा, 24 तास वीजपुरवठ्यासह पक्के घर असेल असे जाहीर केले होते.
तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरांची संकल्पना मांडली होती. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवात केली. त्यासाठी 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही महत्वपूर्ण योजना हाती घेतली. ही योजना तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. आवास योजनेतील अनेक घरांची कामे अपूर्ण आहेत. काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. या योजनेअंतर्गत वाटप केलेल्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी वाढविण्याची आवश्यकता आहे.