हॉटेल उद्योगाची अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी
मुंबई – लॉकडाऊनमुळे ज्या क्षेत्रावर सर्वांत जास्त परिणाम झाला आहे, त्यामध्ये आदरातिथ्य क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रातील महसूल ठप्प झाल्यामुळे या क्षेत्राला कर्ज परतफेड करणे अवघड झाले आहे. त्यासाठी हप्ता न भरण्याची सवलत या क्षेत्रासाठी 3 महिने वाढविण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील संघटनांनी म्हटले आहे.
फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेचे उपाध्यक्ष गुरुबक्ष सिंग म्हणाले की, 4 महिने हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योग पूर्णतः बंद होता. यावेळी महसूल शून्य होता. त्याचबरोबर मेंटेनन्स आणि कर्मचाऱ्यासाठी या उद्योगाला खर्च करावा लागला. आता काही शहरात लॉकडाऊन अंशतः कमी करण्यात आले असले तरी नागरिक हॉटेलमध्ये राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी फारसे येत नाहीत. सध्या या उद्योगाचा महसूल काहीच नाही.
मात्र, कर्मचारी आणि मेंटेनन्सवर या उद्योगाला खर्च करावा लागत आहे. लघुउद्योगांना कर्ज फेररचनेची सवलत दिलेली आहे. मात्र, त्या सवलतीचा या उद्योगाला फारसा उपयोग होत नाही. कर्जफेररचनेसाठी फारच कमी वेळ दिल्यामुळे अनेकांना या सवलतीचा फायदा घेता येणार नाही. त्यासाठी हप्ता न भरण्याची सवलत आणखी तीन महिने वाढविण्याची गरज आहे. या क्षेत्रातील अनेक उद्योग दिवाळखोर झाले आहेत. अनेक दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहेत.
केवळ 10 टक्के व्यवहार
काही शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे अंशतः आदरातिथ्य उद्योग सुरू झाला आहे. मात्र, तरीही संसर्गाच्या भीतीने नागरिक किंवा व्यावसायिक प्रवास टाळत आहेत. त्यामुळे सध्या केवळ 10 ते 20 टक्के ग्राहक परतले आहेत. यातही राहण्यासाठी ग्राहक फार कमी येतात. मात्र, अन्नपदार्थाच्या पार्सलमुळे रेस्टॉरंट उद्योगाची उलाढाल थोडीफार वाढली असल्याचे या क्षेत्रातील उद्योजकांनी सांगितले.