कोल्हापूर – दख्खनचा राजा श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नवरात्र उत्सव काळात अनेक भाविक जोतिबा दर्शनाला येतात. यावेळी निर्जन ठिकाणी भाविकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून येण्याच्या घटना घडल्या होत्या.
या अनुषंगाने कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सचिन बलभीम कारंडे आणि शहाजी बबन लोखंडे या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर गावचे रहिवाशी आहेत.
या दोन्ही आरोपींवर सातारा जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा आणि दहिवडी पोलिस ठाण्यांमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. या दोघांकडून तपासात दहा ग्रॅम वजनाचे दोनशे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25 हजार रुपये गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.