इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – करोनाच्या काळानंतर द्राक्ष बागायदारांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी द्राक्ष निर्यातीसाठी परवानगी मिळत असते. उत्पादक शेतकर्यांना अनुदान दिले जाते; मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून, द्राक्ष बागायतदार संकटात आले.
त्यांचे अतोनात हाल झाले. चीन या देशांमध्ये द्राक्षाला सर्वाधिक दर मिळतो; परंतु केंद्र सरकारने द्राक्ष बागादारांना निर्यार्त करणार्या द्राक्षाच्या टनावर अनुदान देणे आवश्यक आहे. द्राक्षांवरील निर्यातशुल्क कमी करावे. खरे तर शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान केंद्र सरकारने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत.
इंदापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी मागील 10 ते 15 वर्षांपासून नव्याने निर्माण झाले आहेत. यामध्ये बोरी, कळस, निमगाव केतकी, वरकुटे, शेटफळ हवेली, लाखेवाडी, भिगवण परिसर वालचंदनगर व इतर गावातील शेतकरी द्राक्षांपासून हक्काचे उत्पादन घ्यावे यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. खरे तर द्राक्ष बाजारात जाईपर्यंत विक्रीपर्यंत काळजी शेतकर्यालाच घ्यावी लागते. अवकाळी व दराचा फटका रोगराईचा फटका या द्राक्ष उत्पादकांना सोसावाच लागतो. यातूनही द्राक्ष शेती आदर्श करणारे इंदापूर तालुक्यातील शेतकरी द्राक्ष उत्पादकातील मॉडेल ठरले आहेत.
या संदर्भात दैनिक प्रभातने इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील प्रगतशील शेतकरी व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्याशी संवाद साधला. यावेळी माहिती देताना ढोले म्हणाले की, आम्ही तब्बल 42 एकर शेतीमध्ये नानासाहेब पर्पल जम्बो द्राक्ष बागेची लागवड गेल्या दहा वर्षापासून केली आहे.
संपूर्ण द्राक्ष दुसर्या देशात विक्रीसाठी जात असते. या द्राक्ष बागेतील प्रति एकरी एक्सपोर्ट कॉलिटीचा माल, आठ ते नऊ टन घेतला जातो. याच बागेतील इतर राहिलेला दोन ते तीन टन द्राक्षाचा माल, देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकला जातो.
या द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत अतिशय चांगलीच मागणी आहे. या द्राक्षांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे मलेशिया देशांमध्ये नानासाहेब पर्पल द्राक्ष मोठ्या प्रमाणात नागरिक खाण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची द्राक्ष येथील बाजारपेठेत दरारा निर्माण करून आहेत.
मागील कालावधीत या शेतातील द्राक्ष सौदी, दुबई, चीन, रशिया, बांगलादेश यामध्ये निर्यात झाले आहे. द्राक्षाला खर्या अर्थाने वर्षभर मेहनत घ्यावी लागते. यामध्ये एप्रिलमध्ये पहिल्यांदा खरड छाटणी, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पीक कापणे, ही द्राक्ष तयार होण्यासाठी एक 130 दिवस जातात.
दुबई, सौदी अरेबिया, सिंगापूरकडे निर्यात
प्रगतशील शेतकरी श्रीमंत ढोले यांनी आपल्या शेतामध्ये तब्बल 42 एकर द्राक्ष बाग फुलवले आहे. या द्राक्षाच्या पाण्या सिंचनासाठी सात कोटीची क्षमतेची तीन शेततळी केलेली आहेत. या बागेतून प्रति एकर वर्षाला 12 ते 15 लाख उत्पन्न मिळते. अडीच ते तीन लाख रुपये खर्च होतो.
आम्हाला 80 ते 85 एकर क्षेत्र आहे व इतर क्षेत्रात जनावरांसाठी चारा पिके घेतली जातात. सध्या 35 एकर द्राक्ष कटिंग झालेले आहे. दुबई, सौदी अरेबिया, सिंगापूरकडे निर्यात झालेले आहे. 111 रुपये ते 131 रुपये, देशांतर्गत 65 ते 70 रुपये प्रति किलोला तर मिळत आहे. देशांतर्गत हैदराबाद, आंध्र प्रदेश या ठिकाणी विक्रीसाठी द्राक्ष पाठवली जाते.
राजकारण व शेती याला एकत्र करून आपला मुख्य शेती व्यवसाय, त्यामुळे उपजीविकेचे साधनच शेती आहे. आधुनिकतेचा व तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेती करत आहोत. सकाळी आठ वाजल्यापासून उत्पन्न हातात पडेपर्यंत द्राक्ष शेतीमध्ये काम करावे लागते. नंतरच समाजकारण राजकारणामध्ये लक्ष देतो. श्रीमंत ढोले, माजी सदस्य जिल्हा परिषद