देहूरोड (वार्ताहर) – जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील देहूरोड येथील देहूफाटा चौक (डिफेन्स) मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी गतिरोधक व वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्याची मागणी होत आहे. गत आठवड्यात एका महिलेसह तीन जणांचा अपघाती मृत्यू झाला. एका व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाल्याने कायम स्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे अजून किती जणांचे जीव घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील देहूरोड येथील देहूफाटा चौक आहे. हा जुना पुणे – मुंबई महामार्ग असल्याने येथून जाणारी वाहने सुसाट धावतात. तर, याच्या आजूबाजूला मोठी वस्ती आहे. त्यामुळे कामानिमित्त उपनगरांमधून ये-जा करणाऱयांची मोठी वर्दळ असते. परिणामी हा रस्त २४ तास रहदारीचा आहे. तसेच याच रस्त्याने श्री क्षेत्र देहू येथे भाविकांची सतत वर्दळ असते.
त्यामुळे या वर्दळीत भाविकांची गर्दीही असते. मात्र, देहूगावाकडे जाणाऱया हा रस्ता महामर्ग असल्याने वाहने सुसाट धावत असतात. या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी तसेच नागरिकांना हा रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी गतिरोधकांची तसेच वाहनांची गती कमी करण्यासाठी देहूफाटा चौकात वाहतूक नियंत्रक दिव्यांची गरज आहे. प्रशासनाने लक्ष घालून येथे गतिरोधक व वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची गरज आहे.
देहूरोड येथे रेल्वे पुलावरून निगडीकडे जाणारा आणि केंद्रीय विद्यालय नंबर २ हे दोन्ही ठिकाण उताराचे आहे. या दोन्ही उतार दिशेने येणारी वाहने सुसाटपणे धावत असतात. निगडी, देहूरोड, देहूच्या दिशेने वाहने देहूफाटा या चौकात येत असतात. रस्ता ओलंडताना वाहन चालक, पादचारी प्रवासी यांना आपला जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो. या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे व शासकीय नियमानुसार आधुनिक पद्धतीचे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थ करू लागले आहे.
…तर जीव गेला नसता
मागील आठवड्यात याच ठिकाणी दुचाकीला अपघात होऊन एका २४ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. तर, दुचाकी चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले. या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे आणि गतिरोधक असते तर त्या निष्पाप तरुणीचा जीव गेला नसता. प्रशासनाने त्वरित या ठिकाणी गतिरोधक, वाहतूक नियंत्रक दिवे बसवावेत. तसेच भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल उभारवा.-शिवलिंग करवीर, ग्रामस्थ, माळीनगर, देहू.