कोलकाता – श्रीलंकेचा संघ भारतात दाखल होत असून या दोन संघात टी-20 व कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेप्रमाणे श्रीलंकेविरुद्धही संघात सातत्याने प्रयोग केले जातील, असा खुलासा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने केला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांच्या मालिकेत फलंदाजीचे क्रमांक, मधल्या फळीत अष्टपैलू खेळाडूला फलंदाजीला पाठवणे तसेच गोलंदाजीतही काही प्रयोग केले गेले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यांतही रोहितने स्वतःची सलामीची जागा ऋतुराज गायकवाडसाठी रिक्त करून दिली. हा सामना संपल्यावर माध्यमांशी बोलताना रोहितने असेच प्रयोग यापुढेही कायम केले जातील, असे सांगितले.