अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत आम्ही अपेक्षित कामगिरी करु शकलो नाही. ज्या वेगाने धावा जमवायला हव्या होत्या, ते घडले नाही व त्यामुळेच सलामीच्या लढतीत गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला, असे मत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याने आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या 92 धावांच्या खेळीनंतरही आम्ही संघाची धावसंख्या द्विशतकी फलकावर लावू शकलो नाही. मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजी झाली तसेच मोक्याच्या क्षणी आम्ही प्रमुख फलंदाज गमावले व त्यामुळे नंतरच्या फलंदाजांवर दडपण आले.
आमची गोलंदाजी येईल, तेव्हा मैदानात मोठ्या प्रमाणात दव असेल, याची आम्हाला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे धावफलकावर आणखी किमान 30 ते 40 धावा जास्त हव्या होत्या. मात्र, आम्ही जेमतेम 178 धावा करु शकलो. या सामन्यात ऋतुराजने चांगलीच फलंदाजी केली. ऋतुराजप्रमाणे आणखी फलंदाज पुढे येऊन आक्रमक फलंदाजी करायला आले, तर कोणत्याही संघासाठी चांगलेच असते. आमच्या फलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अपेक्षित गतीने खेळी केली नाही, असेही धोनीने म्हटले आहे.
#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय
इम्पॅक्ट खेळाडूमुळे तोटा – हार्दिक पंड्या
इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आल्यापासून कर्णधार म्हणून काम जास्त कठीण बनले आहे. संघात सगळेच अव्वल खेळाडू असले की इम्पॅक्ट खेळाडू म्हणून कोणाला निवडायचे, हा प्रश्न प्रत्येक कर्णधारासमोर निर्माण होणार आहे. त्यामुळे तोटाही होऊ शकतो, असे मत गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने व्यक्त केले आहे.