पुणे- पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा ठोस निर्णय झाला. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनी अद्याप काही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर अंतिम वर्षाच्या परीक्षेची टांगती तलावर कायम असल्याचे दिसून येत आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण व अध्यापन शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्यावर अद्याप ठोस निर्णय होऊ शकला नाही. शिखर संस्थांनी परीक्षेच्या निर्णयास अजूनही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.
एवढेच नव्हे, तर या अभ्यासक्रमांना शिखर संस्थांना परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी शिखर संस्थांना परीक्षा रद्द करण्याचे सूचित करावे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर अजूनही शिखर संस्थांनी परीक्षेसंदर्भात काहीच स्पष्टता केलेली नाही. परिणामी, विद्यार्थी संभ्रमात आहेत.
शिखर संस्थांच्या निर्णयाकडे लक्ष
करोनामुळे ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया, बार काऊन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊन्सिल ऑफ टिचर्स एज्युकेशन, नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शिखर संस्था आहेत. या संस्थांना राज्य शासनाने पत्राद्वारे परीक्षेविषयी कळविले आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॅकलॉकचा निर्णयही अंधातरीच
राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनाही ऐच्छिकचा पर्याय दिला आहे. परंतु बॅकलॉगच्या सुमारे 4 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. यावर दोन दिवसांत विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार असल्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 15 दिवसांपूर्वी केली होती. आजमितीस बॅकलॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर निर्णय अनुत्तरीच राहिला आहे. बॅकलॉगचे विद्यार्थी राज्य शासनाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन अंतिम मान्यता घेण्यासाठी शिखर परिषदेकडे अहवाल सादर केला आहे. त्याचे अजूनही उत्तर आलेले नाही. बॅकलॉगबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत केंद्र सरकार आणि राज्य शासनाने निर्णयात एकसूत्रता आणावी व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा.
– कमलाकर शेटे, अंतिम वर्ष विद्यार्थी