संगमनेर, (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पठार भागातील साकूर गावाच्या शिवारातील मांडवे चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोटारीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनोज गोविंद वाळुंज (वय ३२ रा. पळशी, ता. पारनेर) असे मयत युवकाचे नाव आहे. हा अपघात आहे की घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून, घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली
मंगळवार (ता. १६ ) च्या रात्री अकराच्या सुमारास साकूरकडून मांडवे चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेंडभाजे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला एक कार (एमएच. १५ बीएक्स. ३४७९ ) बेवारस स्थितीत उभी असलेली आढळली. त्या मोटारीत एक युवक निपचित पडलेला परिसरातील काही युवकांनी पाहिला.
त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या युवकाला उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
त्यामुळे या घटनेतील गुढ वाढले असून, त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. या बाबतच्या सर्व शंका व संशयास्पद बाबींचा शोध पोलीस करीत असून, पुढील तपास हवालदार आर. व्ही. भुतांबरे करीत आहेत.