कोपरगाव, (प्रतिनिधी): – श्री रामनवमी निमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या मैदानावर श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने हभप चारुदत्त महाराज आफळे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री विष्णुपुराण महाकथा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी आ.आशुतोष यांनी कार्यक्रमास उपस्थित राहत काखेत झोळी अडकवत श्री साई गाव पालखी सोहळ्यासाठी भिक्षा मागितली.
श्री साईबाबा हयातीत असताना भिक्षा मागूनच भक्तांच्या पोटाची भूक मिटवित असत. त्यामुळे श्रीराम नवमी उत्सवात भिक्षा झोळीला अनन्यसाधारण महत्व आहे. कोपरगाव शहरातून दरवर्षी श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने कोपरगाव-शिर्डी श्री साई पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो.
या सोहळ्याच्या महाप्रसादासाठी येणारा खर्च हा श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाने देखील भिक्षा झोळीची परंपरा पुढे सुरू ठेवत भिक्षा मागूनच हा खर्च आजवर भागविला आहे. श्रीरामनवमीला कोपरगाववरून जाणाऱ्या साई पालखी सोहळ्यासाठी देखील सुरू असलेल्या कथेच्या दरम्यान परंपरेनुसार आ. आशुतोष काळे यांनी भिक्षा झोळी घेऊन भिक्षा मागितली. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून श्री साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाने जपली असून ती यापुढे देखील अखंडपणे सुरूच राहणार आहे.
यावेळी श्री साईगाव पालखीचे सुनील फंड, संतोष चव्हाण, राहुल देवळालीकर, महेश उदावंत, विवेक फंड, रोहित खडांगळे, अमोल देवकर, राहुल आदमाने, संजय जगताप, सुनील मोरे, संदीप दळवी, बंटी दळवी, मोनु दळवी, समर्थ दीक्षित, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर गोसावी, प्रताप गोसावी, सुनील खैरे, आदित्य लोणारी, मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.