गोंदवले – माजी आमदारांना सत्तेचा माज आला आहे; परंतु या निवडणुकीत जनतेच्या पुढे त्यांचे काहीही चालणार नाही. “आमचं ठरलंय’च्या माध्यमातून आम्ही त्यांना गल्लीत नाही तर चौकात औकात दाखवून देऊ, असा टोला जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई यांनी लगावला.
माण विधानसभा मतदारसंघातील “आमचं ठरलय’ या सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ कुकुडवाड गटातील कोपरा सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, माजी सभापती संदीप मांडवे, सदस्य तानाजी कट्टे, डॉ. संदीप पोळ, कविता म्हेत्रे, दिलीप तुपे, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलासराव माने, तानाजी काटकर, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब सावंत, अशोक माने, एस. पी. देशमुख, विष्णूपंत अवघडे, दादासाहेब शिंगाडे, विजय बनसोडे, मंदाकिनी सावंत, नानासाहेब बोटे, दत्ताजी शिंदे, शिवाजी सर्वगौड, अर्जुन खाडे, अंकुश गाढवे उपस्थित होते.
देसाई म्हणाले, “आमचं ठरलंय’मधील आम्ही सर्व जण आमदार होण्याच्या योग्यतेचे आहोत; परंतु तालुक्याला दहा वर्षांत लागलेली कीड घालविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे प्रभाकर देशमुख विजयी होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. माण-खटावमधून नष्ट होत चाललेली संस्कृती व संस्कार पुन्हा रुजवायचे आहेत.
गेल्या दहा वर्षात काहीही विकास झाला नाही. आता परिवर्तनाची गरज आहे. मी वादळात दिवा लावणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळेच तीन वेळा तीन चिन्हे घेऊन मी निवडून आलोय. या मतदारसंघातील माजी लोकप्रतिनिधी उतला मातला आहे. त्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते ठेवले नाहीत. आम्ही कुकुडवाड गटातून देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य देणार आहोत. डॉ. येळगावकर म्हणाले, मी खटावचा आमदार असताना विधानसभेत खटावबरोबर माणचे प्रश्नदेखील मांडले. मात्र, गेल्या दहा वर्षात आपल्या लोकप्रतिनिधीने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले.
आता या भागाचा विकास मीच केला, असा कांगावा करत आहेत. माण-खटावच्या जनतेने आता हे ओळखले आहे. त्यांना भाजप घेण्यास आम्ही विरोध केला असतानाही त्यांना प्रवेश देण्यात आला. ज्यांना गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री समजले नाहीत, त्यांना आता मुख्यमंत्रांचा पुळका आला आहे. स्वतःला जलनायक समजणारे माजी आमदार पाणीप्रश्नावर साडेचार वर्षानंतरच बोलतात. प्रश्न सोडवायला लागणारी धमक प्रभाकर देशमुख यांच्यात आहे. देशमुख म्हणाले, उरमोडीच्या पाण्यासाठी भाऊसाहेब गुदगे, वसंतराव पाटील, सदाशिवराव पोळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, माजी आमदाराने आपणच पाणी आणल्याचे सांगून लोकांना भुलवले आहे. या निवडणुकीत त्यांना तरुण वर्ग माफ करणार नाही.