गृहमंत्री अमित शहा यांचे इतिहासकारांना आवाहन
वाराणसी- जर स्वातंत्र्यवीर सावरकर नसते, तर 1857 मधील पहिले स्वातंत्र्ययुद्ध हे निव्वळ बंड म्हणून गणले गेले असते, असे गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे सांगितले. 1857 च्या बंडाला भारताचा पहिला स्वातंत्र्यलढ्य म्हणून संबोधल्याबद्दल सावरकरांना श्रेय देताना शहा यांनी भारताच्या दृष्टीकोनातून इतिहासाचे पुनर्लेखन करण्याच्या गरजेवर जोर दिला.
जर सावरकर नसते तर 1857 चे बंड हा बंडखोरीचा इतिहास ठरला असता. ब्रिटीशांच्या दृष्टीकोनातून भारताने या स्वातंत्रयुद्धाकडे पाहिले असते, असे शहा म्हणाले. बनारस हिंदू विद्यापीठात ‘गुप्तवंश-वीर: स्कंदगुप्त विक्रमादित्य’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या परिसंवादात देश-विदेशातील इतिहासकार, विद्वान आणि राजकीय विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताच्या दृष्टिकोनातून परंतु कोणालाही दोष न देता भारताचा इतिहास पुन्हा लिहिण्याची गरज आहे. ही आपली जबाबदारी आहे.
चुकीच्या इतिहासासाठी किती काळ ब्रिटीशांना दोष देत बसणार. कोणालाही दोष देण्यापेक्षा जे सत्य आहे, तेच लिहीले जायला हवे, असे आवाहन शहा यांनी उपस्थित इतिहासकारांना केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्यास केंद्र सरकारला सांगितले जाईल, असे महाराष्ट्र भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
रोमलाही पराभूत करणाऱ्या स्कंदगुप्त विक्रमादित्यला आपल्या इतिहासाच्या शीर्षस्थानी आणण्याची गरज आहे. गुप्त शासक या पूर्वांचल प्रदेशातील गाझिपूर येथे राहून इथून काम करत होते, असे मानले जाते. स्कंदगुप्त आणि चंद्रगुप्त यांच्यासारख्या महान राज्यकर्त्यांविषयी सध्याच्या इतिहासामध्ये पुरेसे स्थान दिले गेलेले नाही, असेही शहा म्हणाले. हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रसार करणारे विद्यापीठ स्थापन केल्याबद्दल मदन मोहन मालवीय यांच्याही कामाचे शहा यांनी कौतुक केले.
साहित्य, सैन्य, संस्कृती आणि कला ही जागतिक दर्जाची होती आणि आपण ती मान्य केली पाहिजे. या काळात काश्मीरपासून कंधारपर्यंतच्या भारताने हल्लेखोरांपासून मुक्त केले. आमच्या इतिहासात स्कंदगुप्त यांचे योगदान प्रस्थापित करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. स्कंदगुप्त यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करणारे शहा यांनी केले. आजच्या पिढीला कागदपत्रांच्या अभावामुळे स्कंदगुप्तच्या योगदानाची आणि पराक्रमाचे पुरेसे ज्ञान नाही, याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.