मुंबई – एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय फसवा, धुळफेक करणारा आहे. एनडीआरएफच्या निकषांमध्ये अनेक घटकांचा समावेश नसून एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली.
अजित पवार म्हणाले. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेले पिकांचे, घराचे, शेतजमीनींचे प्रचंड नुकसान आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे, त्यांना अधिक गाळात घालण्याचे काम केले आहे.
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 3 हेक्टर क्षेत्राची घातलेली मर्यादा घालणे अन्यायकारक आहे. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. ही अट अधिक शिथील करण्याची गरज आहे. अतिवृष्टीकाळात शेतमजूरांचा रोजगार बुडाल्याने त्यांनाही मदत केली पाहिजे. घरातील भांडी, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब 3 हजार 800 रुपये एनडीआरएफचा निकष आहे. तो दुप्पट करुन भागणार नाही.
या निर्णयाचा फेरविचार करुन अतिवृष्टीग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल. तसेच एनडीआरएफचे निकष सुधारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीपेक्षा कमी मदत
महाविकास आघाडी सरकारने भांडी, कपडे व अन्नधान्यासाठी प्रत्येकी 5 हजारांप्रमाणे प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला 15 हजार रुपये दिले होते. पूर्ण पडलेल्या घरांसाठी दीड लाख रुपये तर, अंशत: नुकसानीसाठी सरसकट 50 हजारांची मदत दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा अधिक मदत सरकारने यावेळी जाहीर केली पाहिजे. दुकानदार, टपरीधारक यांच्यासाठी एडीआरएफच्या निकषात कोणतीही मदत नाही. महाविकास आघाडी सरकारने अशा घटकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपयांची मदत केली होती. यावेळी या घटकांचा कोणताच विचार केलेला दिसत नाही, तो झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.