मुंबई – राज्यात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे. मागच्या 24 तासांत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक 330 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 200 मिलिमीटपेक्षा जास्त पाऊस पडल्याने नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.
राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.