हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – शाळा म्हणजे संस्काराचे केंद्र, याच ठिकाणी कृतज्ञता, देशभक्ती, बंधूभाव, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता ही शैक्षणिक मूल्य बालमनावर शालेय जीवनातच बिंबवली जातात, असेच नाविन्यपूर्ण उपक्रम कळमनुरी तालुक्याती आदिवासी बहूल भागातील मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय, कवडा या शाळेत दरवर्षी राबवल्या जातात. सहज उपलब्ध साहित्याचा कलात्मक दृष्टिकोनातून वापर करून दरवर्षी अनोख्या प्रकारे “एक राखी सैनिकासाठी” माझी राखी माझे झाड” ” एक राखी कोरोना योद्धासाठी” अशा प्रकारे समाजामध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या अनेक घटकांसाठी, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी या राख्या तयार केल्या जातात आणि दरवर्षी त्या राख्या पाठवल्या जातात.
शाळेतील ग्रामीण भागातील मुली या राख्या तयार करण्यासाठी अतिशय उत्साहाने या कामांमध्ये सहभाग नोंदवतात. याही वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत मुलींनी राख्या तयार केलेल्या आहे, या राख्या सैनिकांना अधिकाऱ्यांना शाळेतील गावातील अनेकांना दिल्या जाणार आहेत. आपला तिरंगा हा भारतीय जन जणसामान्यांच्या मनामनात, हृदयात वसलेला आहे, त्याचा पूर्ण सन्मान व्हावा, त्याचा उत्सव हा सर्व समाजातील घटकांनी साजरा करावा, या उद्देशाने हातावर राखी बांधून देशसेवेचे, देशातील एकतेचे प्रतीक म्हणून राखीच्या साह्याने प्रत्येकाचा हात मजबूत असावा हा उद्देश साकार होईल ही विद्यार्थीनींनाअपेक्षा आहे. या राख्यावर देशभक्तीपर अनेक घोषवाक्यांचा वापर करून या राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
या उपक्रमातून आत्मनिर्भरता हा विद्यार्थ्यांसाठी पुढील आयुष्यात महत्त्वाचा गुण असून तो अशा कार्यक्रमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न या शाळेत दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमातून केला जातो. या अनोख्या अनेक कलात्मक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळतोच त्याचबरोबर विद्यार्थी काहीतरी नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतात. या उपक्रमातून अभ्यासासोबतच कलात्मक सौंदर्यदृष्टीची वाढ होण्यास मदत होते. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय शिक्षा अभियान” या नवीन शैक्षणिक अभियानातुन सुद्धा घोकंपट्टीच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरता, स्वयं स्फूर्तीने शिक्षण, शोधक विचार क्षमतेचा विकास, सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी, कौशल्यावर आधारीत शैक्षणिक धोरण यावर नवीन शैक्षणिक धोरणात भर देण्यात आलेला आहे, याची सुरुवात या शाळेत दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून केली जाते.