नवी दिल्ली – मानवी शरिरात करोनाचा धोका संपुष्टात आणण्यासाठी सध्यातरी कोणतीही लस निर्माण झालेली नाही. तसेच शरिरात ऍन्टिबॉडीज तयार झाल्या तरी अशा रुग्णांचा जीव वाचेल याची खात्रीही देता येणार नाही, असा दावा देशातील राष्ट्रीय रोगप्रतिकारशास्त्र संस्थेतील संशोधकांनी केला आहे.
करोनावर उपयुक्त ठरेल अशी लस तयार करण्याचे काम व संशोधन सध्या जगभरात सुरु आहे. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही. शरिरात ऍन्टिबॉडीजची निर्मिती झाली तरीही त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा जीव वाचेल याचीही खात्री देता याणार नाही. रुग्णांना काही जुने विकार किंवा आजार असतील तर त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. अनेकांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असले तरी सर्वांनाच त्यात यशस्वी होता येइल असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही, असेही मत काही संशोधकांनी व्यक्त केले आहे.
मानवी शरीरात अचानक ऍन्टिबॉडीज तयार झाल्या तर त्या व्यक्तीला विषाणूंची किंवा करोनाची बाधा झाल्याचे आपण म्हणतो. मात्र, त्याचा लाभ त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी होइल असे मानणे चूक आहे. ऍन्टिबॉडीज तयार होण्याची प्रक्रीया तसेच रुग्णाचे आधीचे आजार व सद्य परिस्थिती पाहूनच उपचारांची दीशा ठरवणे सर्वात योग्य ठरेल, असेही या संशोधकांनी सांगितले आहे.
पाच राज्यांत सर्वाधिक मृत्यू
भारतात करोनाचा धोका अद्याप कायम असला तरी मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांतच सर्वाधिक आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण याच पाच राज्यांत आहेत, त्यामुळे चिंतेत भर पडत आहे, असेही या संशोधकांनी म्हटले आहे.