जखाऊ – चक्रीवादळ बिपरजॉय जवळ येत असल्याने आणि गुजरात किनारपट्टीवरील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराजवळ ते धडकण्याची शक्यता असल्याने, या किनारपट्टीवरील दहा किमी अंतरावरील रहिवाशांना तेथून हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कच्छ, पोरबंदर, देवभूमी द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारपट्टी जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी किनारपट्टीजवळ राहणाऱ्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारपासून या रिसरात राहणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी अंतरावर आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर होते. हे वादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी ओलांडून आत येऊ शकते.
मंगळवारपासून बचाव कार्य दोन टप्प्यात करण्यात येणार असून, समुद्रकिनाऱ्यापासून 0 ते 5 किमी अंतरावर राहणाऱ्या लोकांना प्रथम हलवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात किनारपट्टीपासून 5 ते 10 किमी अंतरावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल, ज्यामध्ये लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांना प्राधान्य दिले जाईल.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची प्रत्येकी 12 पथके चक्रीवादळामुळे प्रभावित होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली असून त्यांनी आपद्ग्रस्तांसाठी निवास, भोजन आणि औषधांची व्यवस्था करणे सुरू केले आहे.
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन लोकांनी स्वताहून तेथून निघून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायला सुरूवात केली आहे. कांडला बंदरातील तीन हजार जणांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.