सातारा -ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार जिल्ह्यातील एक हजार 420 हेक्टरचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागांनी तात्काळ पंचनामे करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते. सातारा तालुक्यातील भात, सोयाबीन व भुईमुग 60 हेक्टर, कोरेगाव तालुक्यात सोयाबीन, भाजीपाला व आले 120 हेक्टर, खटाव तालुक्यातील बटाटा, कांदा 70 हेक्टर,
कराडमधील भात, ज्वारी 20 हेक्टर, पाटण तालुक्यातील भात 200 हेक्टर, खंडाळा तालुक्यातील भाजीपाला 5 हेक्टर, वाई तालुक्यातील भात, सोयाबीन व भाजीपाला 15 हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यातील भात 30 हेक्टर, फलटण तालुक्यातील भाजीपाला, मका व ज्वारी 390 हेक्टर, माण तालुक्यातील ज्वारी व मका 510 हेक्टर असे एकूण एक हजार 240 क्षेत्रावरील पिकांचे नुकसान कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार झाले आहे.